
जितेंद्र आव्हाडांनी राजकीय संन्यास घ्यावा
राजेश सावंत: भाजपच्यावतीने रत्नागिरीत आंदोलन
रत्नागिरी:- मनुस्मृतीचा पुस्तकात समावेश करू नये असे सांगण्यासाठी चुकीची कृती करणारे आमदार जितेंद्र आव्हाड खोटारडे आहेत. त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा व घरी बसावे. लोकसभा निवडणुकीच्या काळात संविधानात बदल करणारे भाजपवाले असे सांगणारे आव्हाड यांनी हे कृत्य जाणीवपूर्वक केले असून त्यांनी फक्त माफी मागून चालणार नाही तर त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा त्यांच्याविरोधात मोठे आंदोलन करू, असे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी ठणकावून सांगितले.
भाजपच्यावतीने शरद पवार गटाचे आमदार आव्हाडांचा निषेध करण्यासाठी जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्या वेळी राजेश सावंत पत्रकारांशी बोलत होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांनी या वेळी आव्हाडांविरोधात घोषणाबाजीसुद्धा केली.
राजेश सावंत म्हणाले, आव्हाडांनी देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. महाडच्या चवदार तळ्याच्या ठिकाणी मनुस्मृतीचा पुस्तकात समावेश करू नये म्हणून ते आंदोलन करायला गेले. संविधानात बदल करणारे भाजपवाले असे सांगणारे जितेंद्र आव्हाड खोटारडे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजप ४०० पार झाली तर ते संविधान बदलणार असे आव्हाड बडबडत होते. ज्यांना घटनाकारांचा अभिमान नाही, स्वाभिमान नाही अशा आव्हाडांनी भाजपबद्दल बोलू नये. नुसती माफी मागून चालणार नाही. त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई व्हावी. अटक झाली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल.
या आंदोलनावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, तालुकाध्यक्ष दादा दळी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष हृषिकेश केळकर, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, नंदकिशोर चव्हाण, राजू भाटलेकर, संदीप सुर्वे, नितीन जाधव, विक्रम जैन, मंदार खंडकर, दादा ढेकणे, मनोज पाटणकर, शैलेश बेर्डे, प्रभाकर खानविलकर, संजय निवळकर, अनिरूद्ध फळणीकर आदी उपस्थित होते.