
जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली
रत्नागिरी:- गतवर्षी कोकणात जून ते सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आणि त्यानंतरच्या परतीची सरीही अत्यल्प होती. त्यामुळे यंदा पाणीटंचाईचे सावट गडद झाले आहे. मार्चअखेरीस घेतलेल्या नमुन्यांमध्ये जिल्ह्यात भूजल पातळी खालावल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र वळवाच्या पावसामुळे धरण, विहिरींची पातळी वाढेल आणि टंचाईची तिव्रता कमी राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्याच्या अन्य भागांच्या तुलनेत कोकणावर वरुणराजा नेहमीच संतुष्ट राहिला आहे. गेल्या काही वर्षांपासून इथले पावसाचे स्वरुप काहीसे विस्कळीत झाले आहे. कोरड्या दिवसांचा कालखंड वाढला आहे. मागील हंगामात कोकणात पावसाच्या दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत तब्बल ८०० ते १००० मिलिमीटर कमी पावसाची नोंद झाली. सरासरी पावसाचे प्रमाण थोडे जास्तच असल्यामुळे ‘दुष्काळी’ म्हणावी अशी परिस्थिती कोकणात नाही. पण पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे स्वरूप यंदा गंभीर बनत चालले आहे. बहुसंख्य गावांनी एक दिवसाआड पाणी पुरवण्याचे नियोजन सुरू केले. काही जलस्त्रोत आता आटू लागल्यामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागात टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गंभीरतेचे मुख्य कारण, मोसमात पावसाचे प्रमाण घटल्यामुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत भूजलाची पातळी आणखी कमी झाली आहे. त्या दृष्टीने तीन जिल्ह्यांपैकी सर्वात डोंगराळ आणि म्हणून जास्त पावसाच्या रत्नागिरी जिल्ह्यातली परिस्थिती नमुन्यादाखल बघितली तर मार्चअखेर जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांमधील भूजल पातळीची आकडेवारी पुढीलप्रमाणे दिसते ः मंडणगड ३.४० मीटर (गेल्या पाच वर्षांतील सरासरी ३.३४ मीटर), दापोली ४.६१ मी. (४.५१), खेड ४.०५ मी. (३.८९), गुहागर ७.९४ मी. (७.८३), चिपळूण ४.८१ मी. (४.७५), संगमेश्वर ७.०९ मी. (६.९६), रत्नागिरी ९.५१ मी. (९.१२), लांजा ८.७७ मी. (८.७१), राजापूर ६.६४ मी. (६.३२). मार्च महिन्याच्या तुलनेत या सर्व तालुक्यांमध्ये भूजल पातळी खाली गेली आहे.