
करबुडे फाटा येथे रिक्षा पलटी होऊन चालक ठार
रत्नागिरी :तालुक्यातील करबुडे-उक्षी मार्गावर रिक्षा पलटी होऊन चालक ठार झाल्याचे घटना बुधवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. निलेश रेवाळे (भोके, 35) असे ठार झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, निलेश रेवाळे हा आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन भोके येथून वेतोशीकडे चालला होता. रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला. भोके गावातील लोकांना घरी आणण्यासाठी जात असताना करबुडे फाट्याजवळ रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांनी त्याच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. यामुळे घाबरलेल्या नातेवाईकानी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास तो करबुडे फाटा येथे तो अपघातग्रस्त स्थितीत दिसून आला. नातेवाईकांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या अपघाताची माहिती रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. यावेळी करबुडे पोलीस पाटील हरीश वेद्रे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. ग्रामीण वार्ताला मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात रिक्षा चालकाच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे की कोणत्या वाहनाने मागील बाजूने ठोकर दिली आहे. याचा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.