
मतदानात महिलांचा टक्का पुरुषांपेक्षा कमी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ; ६२.९४ टक्के महिलांनी केले मतदान
रत्नागिरी, ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांचे प्रमाण अधिक असले, तरी मतदानात मात्र महिलांचा टक्का पुरुषांपेक्षा कमीच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान अधिक आहे. तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन मतदारसंघांतील मतदानातील महिलांचा टक्का कमी आहे.
राजकारणात महिलांचा प्रभाव अद्याप वाढलेला नाही. केवळ आरक्षण आहे, म्हणून महिलांना संधी मिळते, असे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेबाबत हा अनुभव सार्वत्रिक आहे. केवळ राजकीय आघाडीवरच नाही, तर मतदानाबाबतही महिला फारशा उत्सुक नाहीत की काय, असा प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून दिसत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला मतदारांचे प्रमाण अधिक असतानाही प्रत्यक्ष मतदानावेळी महिलांमध्ये उत्साह नव्हता. टक्केवारीचा विचार केला तर कणकवली विधानसभा मतदारसंघात ६३.७७ टक्के महिलांनी मतदान केले आहे. सर्वांत कमी ५६.९८ टक्के मतदान चिपळूण विधानसभा मतदारसंघात झाले आहे. लोकसभा मतदारसंघात सरासरी ४९.४२ टक्के महिलांनी मतदान केले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ७ लाख १४ हजार ९४५ पुरुष आणि ७ लाख ३६ हजार ६७३ महिला मतदार आहेत. त्यातील ४ लाख ५९ हजार ९९ पुरुषांनी, तर ४ लाख ४८ हजार ५१८ महिलांनी प्रत्यक्षात मतदान केले. म्हणजेच पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी आहे ५०.५८ आणि महिला मतदारांची टक्केवारी आहे ४९.४२ टक्के. महिलांची संख्या अधिक असतानाही मतदानात त्यांचा सहभाग पुरुषांपेक्षा कमी होता. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १ लाख १२ हजार ७९५ पुरुष, तर १ लाख ११ हजार ६७६ महिला आहेत. केवळ याच मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा कमी आहे. त्यात मतदानात महिलांची संख्या आणखी कमी झाली आहे. येथे ७० टक्के पुरुषांनी, तर ६२.९४ टक्के महिलांनी मतदान केले आहे.