
सात तालुक्यात बांबू लागवडीकडे दुर्लक्ष
रत्नागिरी: जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायतींमध्ये बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यामधून १४ लाभार्थी निवडण्यात आले. त्यावर सुमारे दीड लाख इतका खर्च करण्यात आला. यामध्ये राजापूर आणि लांजा तालुक्यांचा समावेश आहे तर सात तालुक्यात बांबू लागवडीकडे दुर्लक्ष होत असल्याने ते अजूनही उपेक्षितच आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांबू लागवड आणि फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. या योजनांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या हातात खेळते भांडवल आले असले तरी जिल्ह्यातील ७ तालुक्यांनी सुमार कामगिरी केली आहे. त्यामुळे किरकोळ खर्च झालेला आहे तर राजापूर आणि लांजा तालुक्यात अनेक लाभार्थ्यांनी बांबू लागवडीचा उपक्रम राबविला. यातून दीड लाख निधी शासनाचा खर्च झाला. यासाठी कृषी सहाय्यक मंडळ अधिकारी या सर्वांचे मोठे योगदान लाभले. अन्य तालुक्यातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांनी किरकोळ काम केल्याने आणि जनजागृतीचे प्रमाण कमी असल्याने बांबू लागवड योजना या तालुक्यात होऊ शकलेली नाही. त्यामध्ये चिपळूण, गुहागर, दापोली, खेड, रत्नागिरी, मंडणगड या तालुक्यांचा समावेश आहे. या निमित्ताने दर महिन्याला गटविकास अधिकारी नेमका कोणता आढावा घेतात, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.