
कंत्राटदार आजपासून बेमुदत संपावर
रत्नागिरी :शासनाची सर्व विभागातील विकासाची कामे करणारे लहान मोठे कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार, स्थापत्य अभियंता, छोटे विकासक यांचा समावेश असलेले कंत्राटदार आज ७ मे पासून बेमुदत संपावरच जाणार आहेत. कामाची देयके मिळत नसल्याच्या निषेधार्थ कंत्राटदारांनी हा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत कामे करणार नसल्याचा एकमुखी निर्णयही कंत्राटदारांनी घेतला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास जलजीवन मिशन, जलसंधारण, ग्रामविकास आदी विकासकांची कामे करणाऱ्या कंत्राटदार यांची देयके तातडीने देण्यात यावी, कंत्राटदार यांचे कुटुंब व त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना वर्षानुवर्षे देयकेच मिळत नसल्याने आर्थिक पिळवणूक होत असून कंत्राटदारांवर अक्षरशः उपासमारीची वेळच आली आहे. सर्व विभागाकडील विकासाची कामे मंजूर करण्याअगोदरच कामास निधीची उपलब्धतता असल्याशिवाय निविदा प्रक्रिया अजिबात राबवण्यात येऊ नये, अशी मागणी कंत्राटदारांची आहे. कामाच्या अनामत रक्कमेपोटी कंत्राटदारांची १० हजार कोटीची रक्कम शासनाकडे जमा झाली आहे. कामे पूर्ण अथवा काही प्रमाणात झाल्यानंतर कामांना पर्यायाने कंत्राटदारांना निधी कधी मिळणार, शासनाकडून याची कुणीही व प्रशासनाकडून खात्री देत कंत्राटदारांची कोंडी होत आहे. यामुळे अवाढव्य स्कमेची देयके कंत्राटदारांना मिळणार कसे, याचा कृती आराखडा शासनाने तयार करून सादर करावा, या आराखड्याची एक प्रत उच्च न्यायालयात शासनाने सादर करणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे. कामे सर्व विभागाची विकासाची करताना स्थानिक नेते, राजकीय मंडळ व इतर उपद्रवी लोकांचा त्रास होत आहे. कंत्राटदारांना जीवे मारण्याच्या धमक्या देत खंडणी मागण्याचे प्रकार देखील होत आहेत. कामे निकृष्ट म्हणून बंद पाडण्याचे प्रकार सर्रासपणे होत आहेत. यामुळे कामे करताना कंत्राटदारांना अडथळे निर्माण होत असून शासनाने यावर तातडीने निर्णय घेणे व इतर मागण्यांचाही समावेश आहे.