
विनाशकारी प्रकल्प कोकणातून हद्दपार करू: उद्धव ठाकरे
रत्नागिरी:- इंडीया आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या केवळ जमिनीवरूनच नव्हे, तर सरकारी कागदपत्रांवरूनही हद्दपार करून टाकू,” असे आश्वासन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतर्फे उभे राहिलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी रत्नागिरी शहरात सभा झाली. त्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र तेजस ठाकरेही त्यांच्यासोबत होते.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह भाजपवर टीकास्त्र सोडले. नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावरही त्यांनी टीका केली. ”अब की बार चारसौ पार” नव्हे, तर ”अब की बार भाजप तडीपार” अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.
त्यांचे सरकार येणार नाहीच; पण त्यांचे सरकार आल्यास त्यांचे स्वप्न हेच असेल, की फौजा आणून उभ्या करू आणि बारसू, जैतापूरसारखे प्रकल्प करू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
भारतीय राजकारणाची परिस्थिती आयपीएलसारखी झाली आहे. ती इंडियन पॉलिटिकल लीग झाली आहे. मोदीजींचा २०१४ आणि २०१९ सालचा जो आत्मविश्वास होता, तो आता दिसत नाही. आम्हीही त्या वेळी फसलो होतोच. तेव्हा ५६ इंचांची छाती होती. आता त्या छातीतली हवा गेली आहे. एक अकेला सब पे भारी असे ते पूर्वी म्हणायचे. आता ”आजूबाजू सब भ्रष्टाचारी” अशी परिस्थिती झाली आहे. नाकर्त्याच्या हातात भाजप गेला आणि त्यांनी उरलासुरला भाजपही संपवून टाकला. त्यामुळे अटलजींचा आत्मा वरून रडत असेल, असे श्री. ठाकरे म्हणाले.
त्यांना शिवसेनेतली घराणेशाही नको आहे; पण गद्दारांची, गुंडांची घराणेशाही चालते. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या यंत्रणा म्हणजे सरकारचे घरगडी आहेत. उद्या आमची सत्ता आल्यानंतर या यंत्रणांच्या नांग्या ठेचल्याशिवाय राहणार नाही. हे शिवसेनेबरोबरचे कोकणाचे नाते तोडायला निघाले आहेत. कोकणातला जांभा दगड एके काळी लाव्हारस होता. आज संपूर्ण कोकणात, महाराष्ट्रात भाजपविरोधात लाव्हारस उसळून वर आला आहे, अशी टीकाही श्री. ठाकरे यांनी केली.
१० वर्षांच्या थापा म्हणजे मोदींची गॅरेंटी आणि दुसरीकडे माझे वचन, यातून लोकांना निवड करायची आहे. जे होण्यासारखे असेल तेच मी बोलतो आणि जे बोलतो ते मी करून दाखवतो, असेही ठाकरे म्हणाले.
जय भवानी जय शिवाजी या घोषणेबद्दल आक्षेप घेतला जातो. यांना महाराष्ट्राबद्दल आकस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राच्या सुपुत्राने लिहिलेले आहे म्हणूनच देशाचे संविधान त्यांना बदलायचे आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला.
त्यांनी अख्खा कोकण विकायलाच काढला आहे. सिडकोकडे किनारपट्टीच्या विकासाची जबाबदारी देणे हा पुढचा धोका आहे. मोदींना निवडून द्या असे गेल्या वेळी सांगितले, ही माझी चूक झाली. करोनापेक्षाही मोठा धोका भाजपच्या हुकूमशाहीचा आहे. त्यापासून दोन हात लांब राहा, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी केले.
ज्यांनी आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरले, ज्यांनी आमच्या पक्षप्रमुखाला अपमानास्पद पद्धतीने पदच्युत केले, त्यांच्याविरोधात शिवसैनिक पेटून उठला आहे, असे आमदार भास्कर जाधव म्हणाले.
कोकणातल्या चार जिल्ह्यांतल्या १६३५ गावांतली जमीन सिडकोच्या घशात घालण्यात येत असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला. आमदार राजन साळवी, वैभव नाईक यांच्यासह महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.