
किरबेट येथील रूपाली गोसावी झाली मुंबई पोलीस
रत्नागिरी:- जिल्ह्यातील दुर्गम अशा संगमेश्वर तालुक्यातील किरबेट ओझरवाडी येथील एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली रूपाली गणपत गोसावी हिची मुंबई येथे पोलीसअंमलदार म्हणून नेमणूक झाली आहे.
रूपालीचे आई वडील अशिक्षित व शेतकरी आहेत. त्यामुळे तिच्या भावाने स्वत: न शिकता रूपालीला बारावीपर्यंतचे शिक्षण दिले, मात्र परिस्थिती गरीब असल्यामुळे तिला पुढचे शिक्षण घेता आले नाही. कुटुंबाला आपला हातभार लागावा म्हणून रूपाली मुंबई येथे नोकरीसाठी गेली, मात्र तिच्यातील हुशारी पाहून तिच्याच वाडीतील सध्या मुंबई येथे पोलीस असलेली तिची मैत्रीण सुषमा रवंदे हिने रूपालीला पोलीस ॲकॅडमी मध्ये स्वत: फी भरून दाखल केले व पूर्णपणे तिच्यावर लक्ष देऊन यशाचा मार्ग दाखवला.
याच मैत्रिणीने व अशोक रवंदे यांनी पोलीस भरतीच्या वेळी येणार्या अडचणींवर मात कशी करायची याचा सल्ला यांनी दिला व तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. यावेळी तिच्या भावाने सुद्धा तीने पोलीसात भरतीमध्ये लक्ष द्यावे म्हणून खूप मदत केली.सुषमा रवंदे, अशोक रवंदे व माझा भाऊ यांच्यामुळे मला हे यश मिळाल्याचे रूपाली ने बोलून दाखवले. रूपालीच्या यशाबद्दल ग्रामस्थांमधून अभिनंदन होत आहे.