
टँकर-दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू
रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गाचे काम मागील अनेक वर्ष सुरू आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. अशातच महामार्गावरील पाली नजिक उभी काळी धोंड येथील वळणावर बुधवार ३१ जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास टँकर चालकाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक अमोल अशोक पवार (वय ३५ राहणार, साळवी स्टॉप) हा जागीच ठार झाला असून एक जखमी झाला आहे.
अमोल पवार हे सांगली ते रत्नागिरी असा दुचाकीवरून ( एमएच 08 वाय 4912 ) प्रवास करत होते. त्यांच्यासोबत प्रेम संजय पवार (वय 19 रा. साळवी स्टॉप) दुचाकीच्या मागे बसलेला होता. याच महामार्गावरून टँकर (क्रमांक एमएच 43 सीई 0505) चालक हातखंब्याच्या दिशेने प्रवास करत होता. पाली पासून काही अंतरावर उभी धोंड हे देवस्थान आहे. या वळणावर दोन्ही वाहने आली असता टँकर चालकाने अमोल पवार यांच्या दुचाकीला ओवरटेक करण्याच्या नादात दुचाकीला मागून धडक दिली. जोरदार धडक बसल्याने दुचाकी चालक अमोल पवार हे टँकरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाले. दुचाकीवर मागे बसलेला प्रेम पवार हा तरुण तिथेच जखमी अवस्थेत पडला होता. मोठा अपघात झाल्याचे समजताच टँकरचालकाने तिथूनच पलायन केले.
अपघाताची माहिती मिळताच तातडीने श्री नरेंद्र महाराज नाणीज धामची रुग्णवाहिका घेऊन चालक धनेश केतकर यांच्यासह हातखंबा वाहतूक केंद्राचे ए एस आय जाधव पवार, हेड कॉन्स्टेबल पवार, हेड कॉन्स्टेबल वरवडकर, हेड कॉन्स्टेबल संसारे आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून मृतदेह रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी महामार्गावरील एका मार्गिकेने वाहतूक सुरळीत केली.