
मला अटक झाली तरी चालेल पण.. :आमदार राजन साळवी
रत्नागिरी : आता मला अटक झाली तरी चालेल, पण मी यापुढे एसीबी रायगड कार्यालयाचे पाऊल चढणार नाही. यापुढे एसीबीला कोणतेही सहकार्य करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) उपनेते, आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.
काल सहाव्यांदा झालेल्या चौकशीनंतर आज रत्नागिरीत आल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. आमदार राजन साळवी यांची रायगड एसीबी कार्यालयात पुन्हा चौकशी झाली. त्यांचे कुटुंब चौकशीसाठी हजर होते. वारंवार चौकशीच्या मध्यमातून मनस्ताप दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
साळवी म्हणाले, गेली दीड वर्षे माझ्या संपत्तीची चौकशी रायगड एसीबीकडून सुरू आहे. आतापर्यंत सहावेळा मी एसीबी कार्यालयात जाऊन आलो. अनेक प्रश्नांची उत्तरे मी त्यांना दिली आहेत. माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबाचीदेखील चौकशी करण्यात आली आहे. माझ्या गाड्या किती किलोमीटर फिरल्या, डिझेल खर्च याची माहिती देखील मागितली. तसेच विकासकामांच्या ठेकेदारांना नोटीसा देखील काढण्यात आल्या.
आतापर्यंत मी त्यांना सहकार्य केले. पण माझ्या आईवर झालेल्या उपचाराचा खर्च देखील एसीबीने मागितला. माझ्या संपूर्ण खासगी आयुष्यातील घटना मला विचारल्या गेल्या, हे सर्व काय चालले आहे. मी त्यांना उद्विग्नपणे सांगून टाकले, मी तुमच्याकडे सहा वेळा आलो, हे शेवटचं. यापुढे तुम्ही मला नोटीस पाठवा, गुन्हा दाखल करा पण मी अलिबागच्या एसीबी कार्यालयाचे पाऊल चढणार नाही.
उद्धव ठाकरेंचा साळवींना फोन
एसीबीला इशारा देऊन आल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन केला. मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगत आमदार राजन साळवी यांना धीर दिला.