
तटरक्षक दलाचे अतिरिक्त महानिर्देशक के आर सुरेश, रातप, तप यांनी केला रत्नागिरी दौरा
रत्नागिरी :तटरक्षक कमांडर (पश्चीम तट) चे प्रमुख अतिरिक्त महानिर्देशक (ADG) के आर सुरेश, राष्ट्रपती तटरक्षक पदक, तटरक्षक पदक यांनी दिनांक 12 जानेवारी 24 रोजी रत्नागिरी येथील भारतीय तटरक्षक दलाच्या कार्यालयास भेट देऊन चालू असलेल्या पायाभूत विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. ही विकासकामे पूर्णत्वास गेल्यास सागरी सुरक्षा यत्रणांना अधिक सक्षम करण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत.
ध्वज अधिकारी अतिरिक्त महानिर्देशक (ADG) के आर सुरेश, रातप, तप हे देशाच्या संपूर्ण पश्चीम तटाचे प्रमुख असून त्यांच्या आखात्यारीत गुजरात पासून केरळ राज्यापर्यंतचा संपूर्ण तटीय परिसर येतो. रत्नागिरी हे या क्षेत्रातील एक अतिशय महत्त्वाचे केंद्र असून विविध विकासकामे येथे प्रगती पथावर आहेत.

या दौऱ्यात त्यांनी रत्नागिरी येथे चालू असलेल्या विमानतळावरील एटीसी सुविधा, हँगर आणि डिस्पर्सल या कामांना प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी या कामांना वेळेवर पूर्ण करण्यावर भर दिला जेणेकरून भारतीय तटरक्षक दलाच्या तटीय सुरक्षा यंत्रणेला आणखी मजबूत करता येईल.
यावेळी ध्वज अधिकाऱ्याने तटरक्षक दलाच्या जवानांशी देखील संवाद साधला आणि सेवेच्या सर्वांगीण विकासात सर्वांच्या वैयक्तिक सहभागावर त्यांनी भर दिला. त्यांच्या प्रदीर्घ सेवेतील अनुभव सर्वांपुढे व्यक्त करून सर्वांना प्रेरित केले. त्यांनी तटरक्षक दलाच्या विमानाने रत्नागिरीतील किल्ले येथील भगवती बंदर परिसरात प्रस्तावित जहाज दुरुस्ती केंद्राची म्हणजेच शिपयार्डची हवाई टेहळणी देखील केली.