
महिला, तरुणांनी रोजगारासाठी पुढे आल्यास पूर्ण सहकार्य करणार: मधुकर गोमणे
राजापूर: ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्यासाठी बारा वर्षांपूर्वी राजापूर तालुका युवा विकास मंडळ स्थापन करुन स्वखर्चाने दोन प्रकल्प सुरू केले.मात्र, तरुणांची मुंबईत नोकरी करण्याची मानसिकता असल्याने त्यांना गावात काम करण्याचा कमी पणा वाटल्याने प्रकल्प बंद पडले. पणआता काळ बदलला आहे. महिला, तरुणांनी रोजगारासाठी पुढाकार घेतला तर आपण पूर्ण सहकार्य करु असे आश्वासन राजापूर तालुका युवा विकास मंडळ अध्यक्ष मधुकर गोमणे यांनी पाचल येथे अध्यक्षपदावरून बोलताना दिले.
जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त काॅयर बोर्ड विभागीय कार्यालय सिंधुदुर्ग आणि ग्राम आधार स्वयंसेवी संस्था चिपळूण यांच्या वतीने पाचल ग्रामसचिवालय येथे काथ्या उद्योग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उमेद तालुका अभियान यांनी सहकार्य केले. यावेळी अध्यक्षस्थाना वरुन श्री.गोमणे बोलत होते.
बचतगट बाबत बोलताना श्री. गोमणे पुढे म्हणाले की, लिज्जत पापड कंपनी बचत गटाच्या माध्यमातून नावारुपाला आली. आपल्याकडील बहुतेक बचतगट व्यवसाय कमी आणि कर्ज काढण्याचं काम ज्यास्त करतात.काॅयर बोर्ड आणि ग्राम आधार स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने काथ्या उद्योग कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्याला उमेदच सहकार्य लाभले असले तरी ही संधी उपलब्ध करून देणारे शरद मोरे यांचे श्रेय कोणीही नाकारून चालणार नाही असेही त्यांनी सांगितले.
उमेद तालुका अभियान कक्ष व्यवस्थापक अर्चना भंडारी यांनी आपल्या भाषणात, कोणतीही संस्था असो, महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी जी संस्था काम करेल त्याच स्वागत केले पाहिजे. जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार पाचल प्रभागात स्वतंत्र कार्यालय बांधण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. महिलांनी प्रशिक्षण घेऊन आपला व्यवसाय निर्माण करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
काॅयर बोर्ड विभागीय अधिकारी श्रीनिवास बिटलिंगू आपल्या भाषणात म्हणाले, नारळाची सोडण जळाव म्हणून न वापरता त्याचा उपयोग काथ्या उद्योगासाठी केला पाहिजे. नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं ते उगाच नाही. कारण नारळाच्या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा वापर व्यवसायासाठी केला जातो. काॅयर बोर्ड मार्फत काथ्या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. काथ्या उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देऊन प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनही दिले जाते. महिला, तरुणांनी या संधीचा फायदा घेऊन आर्थिक सुबत्ता निर्माण करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ग्राम आधार स्वयंसेवी संस्था अध्यक्ष शरद मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, पाचल परिसरात विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. प्रत्येक पंचक्रोशीत व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न सुरू करणार आहे. त्यामुळे येत्या एकदीड वर्षात जिल्ह्यात पाचल एक माॅडेल तयार करण्यासाठी महिलांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त उमेद तालुका कक्ष व्यवस्थापक अर्चना भंडारी यांच्याहस्ते दीप प्रज्वलन आणि जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सुशिला पराडकर, संजीवनी रायबागकर, स्मिता सप्रे, शशीताई देवरुखकर, दर्शना जाधव यांचा सत्कार आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या धनश्री मोरे यांना जिजाऊ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उमेद तालुका अभियान कक्ष व्यवस्थापक अर्चना भंडारी, पांगरी सरपंच अमर जाधव, जिल्हा क्रिकेट असोसिएशन सहसचिव मनोहर गुरव, भारतमाता प्रभाग संघ अध्यक्ष विनया पवार, तळवडे सरपंच गायत्री साळवी,पत्रकार सुरेश गुडेकर, धनश्री मोरे यांनी आपली मनोगत व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर मूर सरपंच वैष्णवी आगटे, तळवडे सरपंच गायत्री साळवी, ताम्हाणे सामाजिक कार्यकर्ते रमेश चव्हाण, तांत्रिक अधिकारी श्री.भोई, असिस्टंट मॅनेजर श्री.स्वामी ,शारदा विद्यालय आजिवली मुख्यकार्यकारी अधिकारी बाळा पाटील, सदानंद गोमणे, आप्पा साळवी, शशीताई देवरुखकर, दर्शना जाधव , उमेदचे अमित जोशी, पत्रकार तुषार पाचलकर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेदच्या केडर,ग्राम आधार स्वयंसेवी संस्था यांनी परिश्रम घेतले.
