
रत्नगिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचाच दावा ः निलेश राणे
रत्नागिरी ः केंद्र शासनाच्या मायक्रो स्मॉल अँड मिडियम विभागामार्फत (एमएसएमई) फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरीत तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी खासदार श्री.निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपाचाच दावा असून केंद्रीय मंत्री ना.नारायणराव राणे वयोमानानुसार निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा श्री.राणे यांनी केला. लोकसभेची निवडणूक लढविण्याची माझी इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र शासनाच्या मध्यम, लघु, सुक्ष्म उद्योग विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रदर्शनाचे उत्तम नियोजन केल्याने ते गावागावात पोहोचले. विश्वासार्ह योजना म्हणून प्रदर्शनाचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभे राहिले. अशाच प्रकारचे प्रदर्शन रत्नागिरी जिल्ह्यातही भरवावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.राजेश सावंत यांनी केली होती. त्यांच्या मागणीनुसार दि.1 ते 10 फेब्रुवारी दरम्यान रत्नागिरीत प्रदर्शन भरवले जाणार असल्याचे श्री.राणे यांनी सांगितले.
प्रदर्शनात विविध प्रकारचे स्टॉल उभारले जाणार आहे. एमएसएमईमार्फत सादरीकरण केले जाणार आहे. कर्जाऐवजी सुविधा देणे हाच प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे. केंद्र शासन या प्रदर्शनाद्वारे थेट जनतेच्या दारात जाणार असल्याचे श्री.निलेश राणे यांनी जाहीर केले.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणीचा सर्वांनाच अधिकार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून ग्रामपंचायत निवडणुकीत कमळाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. ना.नारायणराव राणे हे वाढत्या वयोमानामुळे लोकसभेची निवडणूक लढणार नाहीत. मला लोकसभेची निवडणूक लढविण्यात कोणतेही स्वारस्य नसल्याचे श्री.निलेश राणे यांनी सांगितले.
भाजपचा कमळ निशाणीवरील अधिकृत उमेदवार लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्यानी विजयी होणार आहे. शत्रुला नेस्तनाबुत करून त्याचा सत्यानाश व्हावा यासाठी लोकसभा निवडणूक हा सर्वात चांगला पर्याय आहे. महायुती म्हणून कधी दोन पावले मागे, दोन पावले पुढे जाण्यात सर्वांचे भले आहे. भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला विजयी करण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते निश्चितच प्रयत्न करतील असा आशावाद श्री.निलेश राणे यांनी व्यक्त केला.