
नाचणेत मैला प्रक्रियेतून 400 किलो नैसर्गिक खत
रत्नागिरी:स्वच्छ भारत मिशनच्या टप्पा 2 अंतर्गत नाचणे ग्रामपंचायतीत (रत्नागिरी) राज्यातील पहिला मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पामधून 400 किलो खत तयार करण्यात यश आले आहे. आजुबाजूच्या ग्रामपंचायतीमधील मैल्यावर प्रक्रिया करून नैसर्गिक गांडूळ खत बनविण्यात येत आहे. गेल्या दहा महिन्यात पाच ग्रामपंचायतीमधील पावणे पाच लाख लीटर मैलावर प्रक्रिया केली आहे.
स्वच्छ भारत मिशनमधून नाचणे येथे मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प नाचणे, शिरगाव, मिरजोळे, खेडशी, कुवारबाव या पाच ग्रामपंचायतींसाठी मंजर करण्यात आला. पाचही ग्रामपंचायतीत सुमारे 12 हजार 357 कुटूंब असून लोकसंख्या 55 हजार 439 आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून 1 कोटी 27 लाख 41 हजार 839 रुपये मंजूर झाले. या प्रकल्पाचे काम पुर्ण झाले असून त्यामधून खतनिर्मितीही सुरू झाली आहे. डिसेंबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत 4 लाख 77 हजार 500 लीटर मैला गोळा करण्यात आला असून त्यापैकी 3 लाख 53 हजार 500 लीटर मैल्यावर प्रक्रिया केली गेली. त्यामधून चारशे किलो खत तयार झाले आहे. त्याचा उपयोग आंबा, काजूसह फळबागायतींना होणार आहे. हे खत 20 रुपये किलोने शेतकर्यांना विक्री करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात मैला गाळ प्रक्रिया करणारा राज्यातील पहिला प्रकल्प आहे. असे प्रयोग महानगरपालिका क्षेत्रात केले जातात. नैसर्गिक पध्दतीने प्रक्रिया केली जात असून खत बनविण्यासाठी गांडूळांचा वापर केला जातो. टँकमध्ये प्रक्रियेतसाठी मैला टाकल्यानंतर सुमारे 40 दिवसात खत तयार होते. ते काढून साठवून ठेवले जात आहे. लवकरच त्याची विक्री केली जाणार आहे. मैला प्रक्रिया केल्यानंतर त्यामधून सुमारे 4 लाख लिटर पाणी बाहेर पडते. त्या पाण्याचा वापर ओल्या कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या प्रकल्पात केला जाणार आहे. त्या प्रकल्पाचेही कामही लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या प्रकल्पातील हे पाणी जवळच्या आंबा बागेतील हापूसच्या झाडांमध्ये सोडले जात आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनीही येणार्या अडचणी सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य केले. या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्नही वाढणार आहे.