
शिवाजीपार्कमधील घटना बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देणारी: ना. उदय सामंत
रत्नागिरी:- मुंबईतील शिवाजीपार्कमधील कै. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केल्यावरून ठाकरे सेनेच्या पदाधिकार्यांनी गोंधळ घातला. हा प्रकार म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देणारा आहे. सेनेची काँग्रेस होण्याची वेळ येईल, तेव्हा हे दुकान बंद करू, असे बाळासाहेबांनी स्पष्ट केले होते. शिवाजीपार्कवर जो गोंधळ झाला तो शिवसेना विरुद्ध काँग्रेस सेना असाच होता. याचा अर्थ तुम्हाला बाळासाहेब कळलेच नाहीत, अशी टिका राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी केली.
दिल्लीच्या कागदावर आमचा पक्ष चालत नाही, अशी कोपरखळीही त्यांनी ठाकरे गटाला लगावली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. दुसर्या दिवशी हा वाद होऊ नये, यासाठी त्यांनी आदल्या दिवशी दर्शन घेतले. परंतु अनेकांचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्याचे धाडस झाले नाही. ते निघुन गेल्यानंतर त्यांनी घोषणा सुरू केल्या. त्यानंतर ठाकरे सेनेने तेथे गोंधळ घातला. शिवसेनची काँग्रेस सेना होऊ लागल्यामुळेच 15 महिन्यांपूर्वी शिंदेंनी हा उठाव केला. त्याला आम्ही समर्थन केले. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखु लागले. बाळासाहेब ठाकरे या महान व्यक्तीच्या स्मृतिदीनी अशा प्रकारे वाद होणे यासारखे दुर्दैव नाही. बाळासाहेब ठाकरे हे व्यक्ती नव्हे तर एक विचार होता. जगात प्रॉपर्टिवर वारस असू शकतो, परंतु विचारांना वारस असू शकत नाही. तुम्हाला बाळासाहेबच कळले नाही. जेव्हा शिवसेनेची काँग्रेस होण्याची वेळ येईल तेव्हा हे दुकान बंद करू, असे बाळासाहेबांनी स्पष्ट केले होते. हिंदुत्वाचे प्रेरक असणार्यांच्या स्मृतिदिनी वाद घालण्याचा हा दिवस नव्हता. तरी जाणीवपूर्वक हा वाद घालण्यात आला. परंतु जेव्हा हा वाद झाला तेव्हा शिवसेना विरुद्ध काँग्रेस सेना असाच वाद दिसत होता. बाळासाहेबाच्या विचारांना ठाकरे सेनेने तिलांजली दिली, असा आरोप ना. सामंत यांनी केला.