
जिल्ह्यात ४ हजार हेक्टरवरील भात कापणी पूर्ण
रत्नागिरी: जिल्ह्यात नवरात्रीचा उत्सव साजरा होत असताना शेतकऱ्यांची भात कापणीची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात साधारपणे ४ हजार हेक्टरवरील हळवी बियाण्यांची कापणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात भात पीक सापडू नये यासाठी बळीराजाची कसरत सुरू आहे. ढगाळ वातावरणामुळे सकाळी भात कापणी करून दुपारी सुकवून सायंकाळी सुरक्षित ठिकाणी रचून ठेवला जात आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मौसमी पावसाने पूर्णतः माघार घेतल्यानंतर तयार झालेल्या भाताच्या कापणीस सुरुवात झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात पावस परिसरासह आजुबाजूच्या ठिकाणी हे चित्र आहे.
तर राजापूर तालुक्यात शिळसह कातळ भागाताील भातशेतांमध्ये शेतकरी राजा कापणीची कसरत करत आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापुरात पाऊस झाला. त्यामुळे भात कापणीच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. मंगळवारी (ता. १७) सकाळच्या सत्रात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाने बळीराजा धास्तावला होता.
काहींनी कापणी थांबली होती. परंतु दुपारी ऊन पडल्यामुळे पुन्हा शेतीच्या कामांना सुरुवात करण्यात आली. दरम्यान, कृषी विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार हेक्टरवरील कापणी पूर्ण झाली आहे.
यावर्षी ४६ हजार हेक्टरवर भात लागवड झाली आहे. दरवर्षी सुमारे ६८ हजार हेक्टवर पीकलागवड होते; परंतु यंदा झालेल्या ऑनलाईन ई-पिक नोंदणीच्या अहवालानुसार २० हजार हेक्टरची तूट आहे.