
मध्य रेल्वे गणपती फेस्टिवल विशेष ट्रेन सोडणार
मुंबई :महाराष्ट्रासह देशभर गणेशोत्सवाची तयारी सुरु आहे. उद्यापासून म्हणजेच 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. मध्य रेल्वेकडून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी नियमित गाड्यांसह नियमित फेऱ्यांसह विशेष गाड्यांची सोय करण्यात आलेली आहे. मध्य रेल्वेनं आता पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईहून 23 सप्टेंबर रोजी कोल्हापूरला जाण्यासाठी एक विशेष गाडी सोडील जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना या निर्णयामुळं दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते कोल्हापूर (01099) या मार्गावर गणपती विशेष गाडी सोडणार आहे. ही गाडी कोल्हापूरवरुन मुंबईला परत येणार नाही. कोकणात जाणारे प्रवासी या विशेष ट्रेनमधून कोल्हापूरमध्ये जाऊन तिथून एसटी किंवा अन्य वाहनांद्वारे कोकणात जाऊ शकतात.
मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार गणपती फेस्टिवल विशेष ट्रेन शनिवारी 23 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12. 30 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईहून सुटेल. ती सकाळी 11. 30 मिनिटांनी कोल्हापूरमध्ये पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणारी ही गाडी दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, हातकणंगले स्थानकांवर थांबेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. ही विशेष एक्स्प्रेस दादरला 00.42, कल्याणला मध्यरात्री 1. 32 वाजता पोहोचेल. लोणावळ्यात 3 वाजता, पुण्यात पहाटे 4 वाजून 5 मिनिटांनी पोहोचेल. तर, जेजुरीत 4. 58 वाजता,लोणंदला 5. 29, सातारा स्थानकावर 7.18, कराडला 8.15, किर्लोस्करवाडीला 8.50 मिनिटांनी, सांगली 9. 40, मिरजला 10.15, हातकणंगलेला 10.40 मिनिटांनी तर कोल्हापूरला साडे अकरा वाजता पोहोचेल. पुणे जंक्शन आणि मिरज जंक्शनला ही गाडी 5 मिनिटे थांबेल इतर स्थानकांवर तीन मिनिटं थांबा असेल.
दरम्यान, या गाडीला 24 डबे असतील. त्यामध्ये 12 स्लीपर कोच, 2 एसएलआर कोच, 2 टीयर एसीचे दोन डबे, थ्री टियर एसीचे 4 डबे आणि चार डबे जनरल क्लासचे असतील. मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार या गाडीसाठी तिकीट बुकिंग 20 सप्टेंबर 2023 रोजी बुधवारी सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे.