
जिल्ह्यात ‘आयुष्मान भव’ आरोग्यविषयक मोहीमेला सुरूवात
रत्नागिरी
रत्नागिरी :केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये शुक्रवारपासून ‘आयुष्मान भव’ ही आरोग्यविषयक मोहीमेला सुरूवात झाली आहे. ही मोहीम 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये अबालवृद्धांच्या आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच आयुष्मान आपल्या दारी आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी आदी उपक्रम असणार आहेत.
आयुष्मान आपल्या दारी 3.0 या उपक्रमामध्ये सर्व जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डाचे वितरण करण्यात येणार आहे. आयुष्मान सभा उपक्रमामध्ये आरोग्यविषयक सेवा-सुविधांची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्राम आरोग्य पोषण समिती मार्फत आयुष्मान कार्ड व आधा कार्ड बाबत जनजागृती, आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
आयुष्मान मेळावा अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवारी किंवा रविवारी असांसर्गिक आजार (मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर – तोंड, गर्भाशय मुख, स्तन) याबाबत तपासणी, क्षयरोग, कुष्ठरोग, ईतर संसर्गजन्य आजार, माता व बाल आरोग्य, संतुलीत आहार व लसीकरण, नेत्रचिकित्सा यांबाबत चार आठवड्यामध्ये तपासणी करण्यात येणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून आठवड्याला किमान एक आरोग्य मेळावा घेण्यात येणार आहे. अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची (0-18 वयोगट) विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मुलांची 32 सामान्य आजारांची तपासणी आणि उपचार करण्यात येणार त्यांना आवश्यक उपयुक्त साहित्य (उदा. चष्मा, श्रवणयंत्र, व्हीलचेअर) देण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमांसोबतच दि.1 ते 17 सप्टेंबर 2023 दरम्यान सर्व आरोग्य संस्थांमध्ये सेवा पंधरवडा राबविण्यात येणार असून त्यामध्ये सर्व संस्थांचे स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व वयोगटातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही ‘आयुष्मान भव’ मोहीम हाती घेण्यात येत
आहे.
तरी याचा जिल्ह्यातील सर्व लाभार्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कीर्तीकिरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.