
डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी विद्यार्थ्यांना दिले स्वावलंबनाचे धडे
रत्नागिरी : आयुष्यात स्वावलंबन अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतःची कामे स्वतः केली पाहिजेत. परदेशामध्ये याचे धडे लहान वयातच मुलांना दिले जातात. त्या शिस्तीवरच अनेक देश मोठे झाले आहेत. त्यामुळे भारतातही ही सवय लावण्यासाठी उच्चविद्या विभूषित डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी सुरवात केली आहे. रत्नागिरीतील अनेक शाळांमध्ये ते मार्गदर्शन करणार आहेत. यातील पहिला कार्यक्रम पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर आणि डॉ. बी. आर. तथा दादासाहेब सामंत ज्युनि. कॉलेज येथे झाला.
डॉ. निमकर यांनी अॅनालिटीकल केमिस्ट्रीतील डॉक्टरेट मिळवली आहे. तसेच सांडोझ नोव्हार्टीस या बलाढय फार्मास्युटिकल कंपनीतील उच्च पदावरील नोकरी ते थेट आल्वोजन कंपनीचे जागतिक पातळीवरचे संचालक (डायरेक्टर, ग्लोबल सप्लाय) आहेत. त्यामुळे त्यांनी जगभरातील अनेक देशांना भेट दिली आहे. ते सध्या त्यांच्या मूळ गावी निवेंडीत वास्तव्याला असतात. डॉ. निमकर यांच्या या उपक्रमाबद्दल ग्रामसुधारक सेवा समिती (पावस) मुंबई यांनीही कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. निमकर यांनी त्यांच्या लहानपणीचे शाळेतील अनेक किस्से विद्यार्थ्यांना सांगितले. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण रोज डायरी लिहिणे अत्यंत आवश्यक आहे, त्याचे अवलोकन करणे गरजेचे आहे, असे सांगितले. दरम्यान, परदेशातील व्यवस्थापन तसेच शिक्षणाचे महत्त्व आणि भारतामधील शिक्षणाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. या वेळी जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे, संस्थेचे जनसंपर्क अधिकारी अवधूत मुळ्ये उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. माने आणि शिक्षक उपस्थित होते.