
रत्नागिरीतील पत्रकारानी स्वच्छ केली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील स्वच्छतागृह
रत्नागिरी – शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचा रत्नागिरीत फज्जा उडाला असून, प्रशासकीय इमारतीमधील दुर्गंधीने कळस गाठल्याने पत्रकारांना झाडू हातात घेण्याची वेळ आली. याचे फोटो जिल्हाधिकार्यांच्या ग्रुपवर पडताच जिल्हाधिकार्यांनी सर्व खातेप्रमुखांची चांगलीच झाडाझडती घेतली. तहसिलदार कार्यालयातील स्वच्छतागृह पत्रकारांनी झाडू हातात घेवून साफ केल्याने प्रशासनाला मात्र मान खाली घालण्याची वेळ आली.
गेले अनेक दिवस रत्नागिरीतील तहसिलदार कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या स्वच्छतागृहाचा विषय चांगलाच गाजला आहे. येणार्या जाणार्या प्रत्येक अभ्यागताला नाक मुठीत धरुन त्या इमारतीत प्रवेश करण्याची वेळ आली होती. तहसिल कार्यालयासह प्रदुषण नियंत्रण मंडळ त्याचबरोबर पर्यटन विभाग व इतर कार्यालये या इमारतीत आहेत. ग्रामीण भागातून येणारा प्रत्येक व्यक्ती कामानिमित्त या कार्यालयांमध्ये येत असतो मात्र गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून तहसिल कार्यालयाच्या इमारतीत असलेले स्वच्छतागृह सार्यांनाच त्रासदायक ठरले होते.
या स्वच्छतागृहाची स्वच्छता नियमित व्हावी यासाठी वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्या मात्र तरीदेखील प्रशासनाला जाग आली नाही. अखेरीस मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने अनोखी मोहिम हाती घेतली गेली. गुरुवारी सकाळी अनेक पत्रकार हातात झाडू, फिनेलचे कॅन घेवून तहसिल कार्यालयाच्या इमारतीत दाखल झाले. यावेळी नगरपरिषदेची पाण्याची गाडीदेखील पत्रकारांनी बोलावून घेतली होती. येथील स्वच्छतागृहाची झालेली दयनीय अवस्था अवघ्या काही मिनिटांत पत्रकारांनी बदलून टाकली. तब्बल ३ स्वच्छतागृहांची साफसफाई करुन पूर्वीची स्वच्छतागृह आणि सफाई झाल्यानंतरची स्वच्छतागृह पाहून सार्यांनीच या अनोख्या स्वच्छता मोहिमेचे स्वागत केले.
एकीकडे स्वच्छता सुरु असताना त्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत सर्व कार्यालय प्रमुखांना पाचारण करण्यात आले होते. स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा इशारा देत प्रत्येक खातेप्रमुखाने आपल्या इमारतीत असलेल्या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी एजन्सीमार्फत सफाई कर्मचारी नियुक्त करावेत, असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच उप अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयाच्या पाठीमागे असणार्या शौचालयात दारुच्या बाटल्या मिळाल्याने जिल्हाधिकार्यांनी संबंधित खातेप्रमुखांची चांगलीच कान उघाडणी केली.
दरम्यान, या स्वच्छता मोहिमेची दखल पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली असून, त्यंानी प्रशासकीय अधिकार्यांना स्वच्छतेबाबत निर्देश दिले आहेत. पत्रकारांनी हातात झाडू घेणे हे डोळ्यात अंजन टाकण्यासारखे असून, असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.