
झाडांचे बारसे उपक्रम आदर्शवत आणि अनुकरणीय : कीर्ती किरण पुजार
वाटद कवठेवाडी शाळेत पर्यावरण रक्षण आणि वृक्षसंवर्धन उद्देशाने वृक्षारोपण
रत्नागिरी : पर्यावरण रक्षण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्व विद्यार्थ्यांना लहान वयातच समजल्यास, भविष्यात ती जाणीव विद्यार्थ्यांमध्ये कायम राहत असते यासाठी वाटद कवठेवाडी शाळेचा झाडांचे बारसे हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय असून हा उपक्रम सर्वत्र राबविण्यासाठी पुढाकार प्रयत्न करणार असल्याचे मत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी व्यक्त केले.
ते रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेने पर्यावरण रक्षण आणि वृक्षसंवर्धन या उद्देशाने आयोजित झाडांचे बारसे या उपक्रमाच्या प्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कोकणातील माणसे ही शाळा आणि झाडे यांच्यावर खुप प्रेम करत असतात. त्यामुळे कोकणातील निसर्ग हा खुप संपन्न आहे. हीच संपन्नता टिकवून ठेवण्यासाठी हा उपक्रम पूरक असून या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालक, ग्रामस्थ यांची उपस्थिती ही शाळा, शाळेतील शिक्षक आणि पालक यांचा सुसंवाद दर्शविणारी आहे. म्हणून या शाळेने राबविलेला झाडांचे बारसे हा उपक्रम भविष्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणारा आणि दिशादर्शक आहे. शाळेने विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी राबवलेले उपक्रम, त्यादृष्टीने सजवलेली शाळा, शिक्षकांची आत्मीयता आणि पालक, ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग पाहून खुप आनंद होत असून शाळेचे कार्य अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
यावेळी सर्वप्रथम स्वागत झाल्यानंतर झाडांचे बारसे करण्यात आले. त्यावेळी पाळण्यात घातलेल्या बाळाला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नावावरून कीर्ती हे नाव देण्यात आले. लगेचच त्याच झाडांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित असणारे रत्नागिरी पंचायत समिती गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनीही शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करताना सर्व ग्रामस्थ, पालकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन करत वाटद कवठेवाडी शाळा ही नियमित नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचा उल्लेख करुन शाळेचे कौतुक केले.
तसेच रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक गजानन पाटील यांनी शाळेचा मागील काही वर्षाचा इतिहास सांगत शाळेसाठी येथील पालक आणि ग्रामस्थ हे एकत्र येऊन राबवत असलेल्या शाळेतील वैविध्यपूर्ण उपक्रमाचा उल्लेख करत, झाडांचे बारसे या उपक्रमातून झाड लावल्यानंतर झाडे वाढविण्यासाठी आणि टिकवण्यासाठी होत असलेले प्रयत्नांतुन वृक्षसंर्धनाचे महत्व विद्यार्थ्यांना आणि समाजाला पटवून देण्यासाठी शाळा, पालक, ग्रामस्थ आणि शाळेतून शिक्षकांचे कार्य सर्वांसाठी आदर्शवत असल्याचे मत व्यक्त करून या उपक्रमाच्या प्रसारासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
या उपक्रमाच्या अनुषंगाने शाळा जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे यांनी शाळेची प्रगती सांगतानाच शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शाळेला अत्याधुनिक बनविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच यावेळी उपस्थित शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावर्षीच्या झाडांचे बारसे या उपक्रमासाठी सौ. सुनीता विनायक कुळकर्णी आणि ग्रामपंचायत वाटद यांनी सहकार्य केले. तसेच यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार साहेब यांच्या हस्ते वृक्षसंगोपन करण्याच्या स्पर्धेतील विद्यार्थी व पालकांचा सन्मान करण्यात आला.
तसेच आजच्या दिवशी वाटद ग्रामपंचायतचया वतीने शाळेला सोलार सिस्टीम बसविण्यात आले, त्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाला वाटद ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया नलावडे, माजी सरपंच अनिकेत सुर्वे, जिल्हा विधी व न्याय समिती सदस्य अरुण मोर्ये, व्यापारी गणेश मित्र मंडळाचे उपाध्यक्ष माधव वारे, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडचे सचिव विलास राणे, सामाजिक कार्यकर्ते काका सहस्त्रबुद्धे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पवार, संदखोल केंद्रप्रमुख अरविंद महाकाळ, वाटद केंद्रप्रमुख एकनाथ महाकाळ, सामाजिक कार्यकर्ते शेखर भडसावळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप पवार, सुरेश नलावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा जिर्णोद्धार समिती अध्यक्ष अप्पा धनावडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास बारगुडे, उपाध्यक्ष वैशाली कुर्टे, उपाध्यक्ष रमेश तांबटकर, शाळेचे बालरक्षक विश्वनाथ शिर्के, माता – पालक संघाच्या उपाध्यक्षा मनस्वी तांबटकर, शिक्षक – पालक संघाचे उपाध्यक्ष अनिल रेवाळे, सांस्कृतिक कार्यक्रम समिती प्रमुख सुवर्णा धनावडे, अंगणवाडी सेविका सुजाता लोहार, संदीप धनावडे, महेश घवाळी यांच्यासह सर्व समितीचे सदस्य, पालक, ग्रामस्थ, आजी – माजी विद्यार्थी यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे आभार माजी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पवार सर यांनी तर या स्तुत्य उपक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक माधव विश्वनाथ अंकलगे यांनी केले.