
आपत्तीचा ध्वनीसंदेश छोट्या मच्छीमारांसाठी फायद्याचा
रिलायन्सची सुविधा ; धोका टळला आणि खर्च ही वाचला
रत्नागिरी :वातावरणातील बदलांवर मच्छीमार समुद्रातील मासेमारीचे वेळापत्रक ठरवतो. त्यासाठी आधूनिक यंत्रणा विकसित केलेल्या आहेत; परंतु छोट्या गिलनेटधारी, फायबर बोटीतून मासेमारी करणार्या मच्छीमारांकडे अशी यंत्रणाच नसते. मासेमारीला समुद्रात जाणे रामभरोसेच. अचानक येणार्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखेच आहे. या परस्थितीत रिलायन्स फाऊंडेशनच्या ध्वनीसंदेशाचा छोट्या मच्छीमारांना आधार मिळत आहे. तंतोतंत माहिती एक दिवस आधी मच्छीमारांपर्यंत पोचत असल्याने समुद्रात ये-जा करणे सुलभ होत असल्याचे गुहागर तालुक्यातील अंजनवेलचे मच्छिमार कृष्णा केशव पडवळ यांनी सांगितले.
अंजनवेल येथे गेली तीस वर्ष पडवळ मासेमारी व्यवसाय करत आहेत. मासेमारीसाठी स्वतःची गील नेट आणि फायबर बोट आहे. मासेमारीच्या बोटी लहान असल्यामुळे त्यात आधुनिक यंत्रणा नाही. ना वायफाय सुविधा ना टीव्ही. त्यामुळे अचानक येणार्या नैसर्गिक आपत्तीचा वेध हा फक्त समुद्रात निर्माण होणार्या परिस्थितीवरच अंदाजे घ्यावा लागतो. वादळ, त्सुनामीची कल्पना समुद्रात गेल्यानंतर मिळते. त्यामुळे धोका पत्करून मासेमारी व्यवसाय करावा लागतो. परंतु मागील दोन वर्षांपासून रिलायन्सकडून ध्वनी संदेशामार्फत हवामानाचा अंदाज, वार्याचा वेग याबद्दल आठ तास आधी अचूक माहिती देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे समुद्रावर मासेमारीसाठी जाण्यापूर्वीच माहीती मिळते. पूर्वी समुद्रात गेल्यानंतर आत काय चाललय ही परिस्थिती समजत होती. तेथून माघारी परतावे लागत होते. मोबाइलवर माहिती मिळत असल्याने मच्छिमारांचे जीवन सुरक्षित झाले आहे. या ध्वनी संदेशामुळे मागील वर्षात जवळपास चार वेळा समुद्रात जाणे टाळल्याचे मच्छिमार पडवळ यांनी सांगितले. प्रत्येकवेळी सूचित केल्याप्रमाणे नैसर्गिक आपत्ती कमी-अधिक प्रमाणात निर्माण झाली. यामुळे धोका टळला आणि समुद्रात जाऊन परत येण्याचा खर्च ही वाचला.