गुहागर समुद्रकिनारी स्वातंत्र्यदिनी बुडालेल्या पर्यटक दाम्पत्याला वाचविण्यात यश
गुहागर : स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी गुहागरच्या समुद्रात बुडणाऱ्या पती पत्नीचा जीव असगोलीतील मच्छीमाराने व गुहागर पोलिसांनी वाचवले. अघटीत टळल्याने सदर कुटुंबासह, गुहागर पोलीस आणि गुहागरकरांनी सुटकेचा निश्र्वास टाकला. ही घटना १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान घडली. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झालेली नाही.
सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे आणि पाऊस कमी असल्याने १२ ऑगस्टपासुन गुहागरातील पर्यटन व्यवसाय बहरला. आलेल्या बहुतांशी पर्यटकांचे पहिले आकर्षण हे समुद्रच असते. त्यामुळे समुद्रावर पर्यटकांची गर्दी वाढु लागली आहे. १५ ऑगस्टला सायंकाळी दोन कुटुंब समुद्रात डुंबण्याच्या तयारीनेच गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आली. त्याच्याजवळ लाईफ सेव्हिंग बोयारिंग देखील होत्या. संध्याकाळी भरती असल्याची माहितीही त्यांनी घेतली होती. या दोन कुटुंबातील काही मंडळी बोया रिंग कमरेत अडकवून समुद्राच्या लाटांवर स्वार होत दंगामस्ती करत होती. त्याच्यातील चाळीशीचे एक जोडपे मस्ती करता करता खोल समुद्रात कधी गेले ते त्यांना कळलेच नाही. पायाखाली जमीन लागत नाही म्हटल्यावर त्यांनी आरडाओरडा सुरु केला. समुद्रात दोघजण बुडत आहेत हे समजल्यावर तातडीने समुद्रकिनाऱ्यावर हलकल्लोळ माजला. तेथे असलेल्या पोलीसांनी, ग्रामस्थांनी दोरखंड आणि अन्य जीवरक्षक साहित्य आणण्यासाठी धावपळ सुरु केली. इतक्यात एक इसम समुद्रात शिरला, सफाईने खोल समुद्रात जावून बुडणाऱ्या त्या दोघांना वाचवले. त्या दोन कुटुंबासाठी तो देवदूत ठरला होता. असगोलीतील मच्छीमारी करणारा चिंतामणी राघो मोरे असे या देवदुताचे नाव आहे.
त्या पर्यटक पती पत्नीसाठी देवदुत ठरलेला, समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित पोलीस आणि ग्रामस्थ, पर्यटकांसाठी चिंतामणी ठरलेला हा मच्छीमार खरोखरच योगायोगाने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर आला होता. चिंतामणी राघो मोरे हे आपल्या मुलाला सोबत घेवून काही कामानिमित्त वेळणेश्र्वरला गेले होते. वेळणेश्र्वरहून गुहागरला ते आले तेव्हा असगोलीला जाणारी मिडीबस निघुन गेली होती. गाडी रस्त्याने असगोलीचे अंतर दूर असल्याने चिंतामणी मोरे यांनी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरुन पायी घरी जाण्याचा निर्णय घेतला. म्हणून बापलेक समुद्रकिनाऱ्यावर आले. त्याचवेळी त्यांना कोणतरी बुडत असल्याचा आरडाओरडा ऐकू आला. क्षणाचाही विचार न करता चिंतामणी समुद्रात झेपावले आणि अघटीत टळले.
संध्याकाळी भरती असली तरी गुहागर बाजारपेठ ते हॉटेल किस्मत या परिसरातील समुद्राचा प्रवाह हा वेगाने आत जाणारा आहे. बोया रिंग जवळ असल्या तरी त्यांचा वापर कसा करावा याची माहिती त्या दोघांना नव्हती. बोयाचा योग्य वापर केला तर पाण्यावर तरंगत राहीले असते. मात्र त्यांना दुसऱ्याची मदत मिळेपर्यंत किंवा किनाऱ्याकडे येणारा प्रवाह मिळेपर्यंत खंबीर रहाणे आवश्यक होते. परंतु त्यातील महिला गंटागळ्या खाऊ लागल्याने तिचा पती देखील घाबरला होता.
गुहागर समुद्र किनारा हा मोठा व लांब असल्याने या ठिकाणी नगरपंचायतीने जीवरक्षक वाढवावे व पर्यटकांसाठी सुचना फलकाचेही आयोजन करावे असे पर्यटकांमधून बोलले जात आहे.