
आंबा – काजू प्रक्रिया उद्योगासह कुक्कुट, शेळी पालन, दूध उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत करा
जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व यंत्रणांचे योगदान आवश्यक –जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी, : आंबा- काजू प्रक्रिया, मत्स्यउत्पादनासह कुक्कुटपालन, शेळीपालन, म्हैस, गाय पालन, दूध उत्पादन, पर्यटन वाढीवर लक्ष केंद्रीत करुन जिल्हयाचे उत्पन्न वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करा. जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्वच यंत्रणांचे योगदान आवश्यक असून त्या दृष्टीने कामकाज करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हा विकास आराखडा तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आढावा बैठक झाली. या बैठकीस प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी डॉ. जस्मिन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, मत्स्यव्यवसायचे सहाय्यक आयुक्त अभयसिंह इनामदार आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापक मनिषा कर्वे आणि त्यांचे सहकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हा उद्योग केंद्र आणि एमआयडीसीच्या वतीने तसेच मत्स्यव्यवसाय विभागामार्फत संगणकीय सादरीकरण करण्यात आले. सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध उत्पादन याविषयाचा पथदर्शी प्रकल्प तयार करण्यासाठी प्रस्ताव करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.
काजू निर्यात करण्यासाठी त्याचे ब्रँडींग आणि मार्केटींग करणे, शासकीय रुग्णालयासाठी प्रयोगशाळा निर्माण करणे, पर्यटन वाढ, प्रक्रिया उद्योग यावरही चर्चा करण्यात आली.