
तोणदेतील मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा
रत्नागिरी :- जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यावर पडणार्या मुसळधार पावसामुळे काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. पाणी नदी किनारी भागातील भात शेतीमध्ये पसरले होते. तर तोणदे गावातील श्री सांब मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. पाऊस कमी झाल्यामुळे सायंकाळी पाणी ओसरल्याने लोकवस्तीपर्यंत पाणी शिरले नाही.
जिल्ह्यात शनिवारी (ता. 22) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी 61.62 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 51.10, दापोली 30.70, खेड 59.80, गुहागर 39.70, चिपळूण 66.40, संगमेश्वर 101.10, रत्नागिरी 34.50, लांजा 84.70, राजापूर 86.60 मिमी पाऊस झाला.
कोल्हापूरसह आंबा घाट परिसरास दिवसभर मुसळधार पाऊस पडत आहे. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूकीतही अडथळा निर्माण झाला. शुक्रवारी रात्रभर जोरदार पाऊस झाला. त्यानंतर वेगवान वार्यासह दिवसभर अधुनमधून सरींचा पाऊस सुरु झाला. त्यामुळे खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीच्यावर वाहत होती. वाशिष्ठी नदीलाही पाणी होते. तर राजापूरची कोदवली नदीला सायंकाळी पाणी वाढले होते. घाटातून वाहत येणार्या काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रत्नागिरीतील तोणदे गावातील किनारी भागात पाणी शिरले होते. त्यामुळे भात शेती पाण्याखाली गेली. तोणदे गावातील शंकराचे पुरातन स्वयंभू सांब मंदिर आहे. ते मंदिर काजळी नदीकिनारी आहे. त्या मंदिराला काजळी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. मंदिराच्या सभोवताली पुराचे पाणी साचल्याने मंदिरात जाण्याचा मार्गही बंद झाला होता. मात्र सायंकाळी पुर ओसरल्यानंतर परिस्थिती सुरळीत झाली.
दरम्यान, सायंकाळनंतर राजापूर येथील कोदवलीला पुर आल्यामुळे पाणी हळूहळू जवाहर चौकापर्यंत दाखल झाले. पावसाचा जोर असाच राहीला तर पुराचे पाणी किनारी भागातील बाजारपेेठेत शिरू शकते. गेल्या दोन दिवसात परिस्थिती नियंत्रणात होती.