
जीव धोक्यात घालून अनेक पर्यटक गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर
रत्नागिरी :तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्र किनारा हवामानातील बदलामुळे बंद असला तरीही सायंकाळी सात वाजल्यानंतर अनेक पर्यटक समुद्रकिनारी जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
सध्या वादळी वारे आणि वादळ सदृश्य परिस्थिती असल्याने गणपतीपुळे समुद्रकिनार्यावर पर्यटकांना जाण्यासाठी दोरखंड बांधून मज्जाव केला आहे.परंतू सायंकाळी 7 नंतर अनेक पर्यटक समुद्रकिनार्यावर गेलेले दिसून येतात.त्यामुळे अशावेळी एखादा अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.मंगळवार 20 जून रोजी गणपतीपुळे येथे मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक आले होते.मंगळवारी रात्री 8 वा. यातील अनेक भाविक आणि पर्यटक समुद्रकिनार्यावरील प्रशासनाने बांधलेले दोर ओलांडून पाण्यामध्ये उतरलेले होेते.दिवसभर गणपतीपुळे ग्रामपंचायत जीव रक्षक मोठी मेहनत घेउन पर्यटकांना समुद्रकिनार्यावरुन बाहेर काढत असतात.मात्र,सायंकाळी अंधार पडल्यानंतर अनेक पर्यटक पोलिस आणि जीव रक्षकांची तमा न बाळगता पाण्यात खेळण्यासाठी तसेच फोटो काढण्यासाठी जात असल्याचे दिसून येते.
यासाठी संस्थान व महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळ यांनी सायंकाळी 7 नंतर आपले सुरक्षारक्षक गणपतीपुळे समुद्रकिनारी तैनात करावेत अशी मागणी गणपतीपुळे ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. कोकणातील गणपतीपुळे हे महत्वाचे पर्यटनस्थळ असून या ठिकाणी विविध ठिकाणाहून येणार्या पर्यटकांची वर्षभर मोठी गर्दी असते. या वर्षी पाउस लांबल्याने गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.