
आरवली ते वाकेड दरम्यान 45 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण
रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील अडथळे लक्षात घेऊन पावसाळ्यापुर्वी आरवली ते वाकेड दरम्यान जुन्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. सुमारे नव्वद किलोमीटरच्या टप्प्यात सुमारे 45 किलोमीटर रस्ता डांबरी आहे. नादुरुस्त रस्त्यांचे पॅच डांबरी करण्यात आले असून त्यावर सहा कोटी रुपये खर्च करण्यात आला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे काँक्रिटीकरण पूर्ण झालेला आणि डांबरी दोन्हीही रस्त्यांचे भाग गणेशोत्सोवामध्ये वाहतूकीस सज्ज ठेवण्यात आले आहेत.
नवीन ठेकेदाराची नियुक्ती झाल्यानंतर आरवली ते वाकेड रस्त्याच्या चौपदरीकरणाला गती मिळाली आहे. अवघड अशा निवळी घाटामध्ये एका भागातील काँक्रिटीकरणही करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी वारंवार बैठका घेत कामामध्ये ठेकेदारांना येणार्या अडचणी सोडविण्यावर भर दिला आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे या 90 किलोमीटरच्या टप्प्यातील रस्ता खराब झाला होता. यावरुन वाहने हाकतानाही अडचणी निर्माण होत होत्या. यावर पर्याय म्हणून खराब झालेल्या डांबरी रस्त्याचे पॅच पुन्हा दुरुस्त करण्यावर भर दिला आहे. लांजा, पालीसह निवळीमध्ये वाहतूक सुरळीतपणे हाकता येत आहेत. या टप्प्यातील पन्नास टक्के काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. पुर्वी वाहने हाकताना अनेक अडचणी येत होत्या. गणेशोत्सवामध्ये महामार्गाची एक लेन वाहतुकीस खुली करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानुसार कामही वेगाने केले जात आहे. काही पुलांची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. पाऊस लांबल्यामुळे काँक्रिटीकरण पूर्ण झालेले रस्ते जुन्या रस्त्यांशी जोडता येत आहेत. आरवली ते वाकेड दरम्यान वाहने हाकताना वाहन चालकांना अडचण येणार नाही याची काळजी बांधकाम विभागाकडून घेण्यात आली आहे.