
रत्नागिरीतील शुन्य शिक्षकी चौदा शाळांमध्ये शिक्षकच पोचलेले नाहीत
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हा परिषदेवर धडकले
रत्नागिरी :तालुक्यातील शुन्य शिक्षकी चौदा शाळांमध्ये शिक्षकच पोचलेले नाहीत. या परिस्थितीत आहेत, त्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेंतर्गत अन्य तालुक्यात जाण्याची परवानगी दिल्याने मोठ्या पटाच्या शाळांमध्येही शिक्षकांची वानवा आहे. यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हा परिषदेवर धडकले. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांना जाब विचारत आठ दिवसात शिक्षकांचा प्रश्न निकाली लावा, अन्यथा पालक, मुलांसह जिल्हा परिषदेत ठाण मांडू असा इशारा दिला.

शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आबा घोसाळे, उदय बने, प्रमोद शेरे, शेखर घोसाळे, महेंद्र झापडेकर, परशुराम कदम, संदीप सुर्वे यांच्यासह ठाकरे सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्षे सुरू होऊन पाच दिवस झाले तरीही रत्नागिरी तालुक्यातील शिक्षकांचा प्रश्न सुटलेला नाही. शुन्य शिक्षकी शाळांमध्ये शिक्षक पोचलेले नाहीत, मोठ्या पटांच्या शाळा दोन शिक्षकांवर चालवल्या जात आहेत. यामध्ये गुणवत्तेवर परिणाम होणार असून पटांवर परिणाम होईल. हे विद्यार्थी भविष्यात खासगी शाळांकडे वळतील. आंतरजिल्हा बदलीमध्ये 724 शिक्षक परजिल्ह्यात गेले, त्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने का सोडले असा जाब तर परशुराम कदम यांनी विचारला. रत्नागिरीच्या गटशिक्षणाधिकार्यांना बोलावून तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. गटशिक्षणाधिकार्यांनी शुन्य शिक्षकी शाळांना प्रत्यक्ष भेटी दिलेल्या नव्हत्या. यावरुनही साळवी, घोसाळे यांनी अधिकार्यांची झाडाझडती केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले तर त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही दिला. उदय बने यांनी शिक्षकांचे समानीकरण का केले नाही असा प्रश्न विचारला. यावर सीईओंनी सात दिवसांमध्ये आढावा घेऊन शिक्षक नियुक्तीविषयी पावले उचलली जातील असे आश्वासन दिले.