
मानसिक आजारमुक्तांसाठी जिल्ह्यात १६ पुनर्वसनगृहे स्थापन करण्यास मान्यता
रत्नागिरी:- मानसिक आजारमुक्त व्यक्तींसाठी राज्यातील पहिल्या टप्प्यात रत्नागिरीसह ४ जिल्ह्यांत स्वयंसेवी संस्थांमार्फत १६ पुनर्वसनगृहे स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. रत्नागिरीसह नागपूर, पुणे आणि ठाणे येथे पुनवर्सनगृहे स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी ५ कोटी ७६ लाखाची आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे.
मानसिक आजारमुक्त व्यक्तींना पुढील उपचारांची गरज नसते किंवा ज्या मानसिकमुक्त व्यक्ती बेघर आहेत किंवा त्यांचे कुटुंबीय स्वीकारत नाहीत, अशांसाठी ही पुनर्वसनगृहे असतील. पुनर्वसनगृहात प्रवेश देण्यात आलेल्या व्यक्तीस विविध प्रकारचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांचे पुनर्वसन करणे, समुपदेशन करणे, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणे, त्यांचा निवास, भोजन, क्रीडा, मनोरंजन, स्वच्छता, संरक्षण आदी बाबींची जबाबदारी पुनर्वसनगृहांनी घ्यावयाची आहे.
पुनर्वसन गृहांमध्ये १८ ते ५५ वयोगटातील तसेच ५५ वर्षांवरील वयोगटातील ज्येष्ठ अशा दोन्ही वयोगटातील पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण १६ पुनर्वसनगृहे सुरू करण्यात येणार आहेत. पुढील टप्प्यामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शिफारशीनुसार मानसिक आजारमुक्त व्यक्तींची संख्या वाढल्यास ती विचारात घेऊन आवश्यकतेनुसार पुनर्वसनगृहांच्या संख्येत वेळोवेळी वाढ केली जाणार आहे.