
शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्यास आंदोलन करणार: विलास चाळके
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात 10 टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्याने आंतरजिल्हा बदलीप्राप्त शिक्षकांना कार्यमुक्त करु नये, असा निकष असतानाही 727 शिक्षक कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षकांची दोन हजार पदे रिक्त आहेत. नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षक नसल्याने शाळा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने याची गंभीर दखल घेतली असून 15 जूनपर्यंत शाळांमध्ये पुरेसे शिक्षक उपलब्ध न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीमुळे जिल्ह्यातील 2000 शिक्षक पदे रिक्त असल्यामुळे याचा शिक्षण क्षेत्रावर फार मोठा परिणाम होणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत शिक्षक संख्येच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षक संख्या रिक्त असतानाही आंतरजिल्हा बदलीप्राप्त शिक्षकांना कार्यमुक्त करु नये असा निकष असतानाही 727 शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. वास्तविक शिक्षक भरती करुनच या शिक्षकांना कार्यमुक्त करणे गरजेचे होते. याची दखल घेत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके व शिवसेना पदाधिकारी यांनी आज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.