
वडापाव विकून मुलांना शिकवले,
मुलांनी मिळविले भरघोस यश
रत्नागिरी :वडिलांची वडापावची छोटीशी टपरी… आपण कष्ट सोसले मात्र आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचे असा निर्णय घेत वडीलांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. मुलांनी देखील वडिलांचा निर्णय सार्थ ठरवत दहावी आणि बारावीच्या निकालात दोन्ही मुलांनी घवघवीत यश संपादन केले.
संगमेश्वर तालुक्यातील धामणी गुरववाडी येथील भिकाजी साळवी आणि भाग्यश्री साळवी या दांपत्याचा मुलगा श्रीराम भिकाजी साळवी हा इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेतून ७५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला तर मुलगी आकांक्षा भिकाजी साळवी हि दहावी मध्ये ८० टक्के मिळवून पास झाली आहे.
दोघांनाही कोणत्याही विषयाचे क्लास नाही लावलेला.
दोघांनाही स्वतःच्या हिमतीवर शिकवले.
साळवी यांचा सुमारे पंधरा ते वीस वर्षे वडापावचा व्यवसाय आहे.दोनही मुलं शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळेतून आल्यावर आपल्या आई वडिलांना मदत करण्यासाठी तत्पर होती. वडिलांना व्यवसायात हातभार लावायचा आणि शिक्षणही घ्यायचे हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. सुट्टीच्या दिवशी आई वडील यांना आपली मदत म्हणून श्रीराम आपल्या आई वडिलांच्या बरोबर दुकानात येतं असे. तर मुलगी आकांक्षा पूर्ण घरकाम करण्यासाठी घरी थांबायची.
दोघांनाही सुरुवातीपासूनच अभ्यासात गोडी निर्माण झाली होती हेच त्यांच्या आई वडिलांना लक्षात आले आणि आपल्या मुलांना पूर्णपणें शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. परीक्षा काळावधीत दोघांनाही कोणत्याही परिस्थितीत कामं करायला लागले नाही पाहिजे याची जबाबदारी संपूर्णपणे आई वडिलांनी घेतली होती. दोघांनाही पूर्णपणे अभ्यासक्रमाकडे लक्ष केंद्रित करावे हा यामागचा मुख्य हेतू होता. दोघंही चांगल्याप्रकारे उत्तीर्ण झालेले पाहून आई वडीलांचा उर भरून आला.
मुलांनीही आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवली.
यापुढे या दोघांनाही जे शिक्षण हवं आहे ते करून देण्यासाठी आम्हाला कष्ट करावे लागले तरीही चालेल पण मुलांचं शिक्षण अर्धवट नाही होणार याची काळजी घेऊ असे साळवी कुटुंब म्हणाले. आई वडीलांनी शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची उणीव भासून दिली नााही. त्यामुळे आम्ही इथपर्यंत मजल मारली असे दोघा भावंडांनी सांगितले.