
कोकण रेल्वे मार्गावर तरुणाचा छिन्न-विछिन्न अवस्थेत मृतदेह
रत्नागिरी :रत्नागिरी ते मुंबई जाणार्या रेल्वे मार्गावर अज्ञात तरुणाचा छिन्न-विछिन्न अवस्थेत मृतदेह मिळून आला.ही घटना शनिवार 3 जून रोजी सकाळी 5.50 वा.उघडकीस आली असून याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत स्टेशन मास्तर अमर मुकादम यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली.त्यानूसार,शनिवारी सकाळी स्टेशन मास्तर मुकादम हे आपल्या कर्तव्यावर असताना रत्नागिरी ते मुंबई रेल्वे ट्रॅकची पाहणी करत होते.त्यावेळी ट्रॅक जवळील मैल दगड क्र.203/1 पासून पश्चिमेला साधारण 50 मीटर अंतरावर मेन लाईनच्या डाव्या बाजुला एका तरुणाचा मृतदेह कंबरेच्या खाली दोन्ही पाय कट होउन पाय व धड वेगवेगळे झाले होते.तसेच.उजवा हात पंज्याच्या वरील बाजुस तुटलेला होता.ट्रॅकवर कोणत्यातरी रेल्वेची धडक बसून तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.