
पावसाळ्यापूर्वी महावितरण ‘अलर्ट’वर
आपत्कालीन स्थितीत वीज पुरवठा खंडित झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
रत्नागिरी :पावसाळ्याच्या दिवसात वादळी वाऱ्याने वीज तारा तुटणे, वीज खांब उन्मळून पडणे, रोहित्र कोसळणे अशा घटना घडण्याची शक्यता वाढते. तेव्हा नागरिकांनी वीज यंत्रणेतील तुटलेल्या तारा, वीज खांबास स्पर्श करणे टाळावे. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. तसेच धोकादायक वीज यंत्रणेची सूचना तत्काळ नजीकच्या महावितरणच्या कार्यालयास द्यावी. आपात्कालीन स्थितीत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. तसेच आपत्कालीन स्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्यास संयम राखून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण विभागाकडून करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक रत्नागिरी जिल्ह्यासाठी 7875765018 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 7875765019 हे आहेत. नागरिक व वीजग्राहक आपत्कालीन स्थितीत या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देऊ शकतात. शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे 1912 वा 19120 वा 1800-212-3435 वा 1800-233-3435 या 24 तास सेवेत असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे.
वीजपुरवठा खंडितची तक्रार 022-50897100 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन नोंदवण्याची सोय आहे, अशी माहिती महावितरण विभागाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.