
आंबा बागायतदारांना व्याजमाफीपोटी ३ कोटी ३५ लाखांची आवश्यकता
रत्नागिरी :आंबा बागायातदारांना सरसकट कर्जावरील तीन महिने व्याजमाफी मिळण्यासाठी जिल्ह्यातील 12 हजार 513 कर्जदार बागायतदारांचे प्रस्ताव उपनिबंधक कार्यालयाकडून शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. व्याजमाफीपोटी 3 कोटी 35 लाख 93 हजार 178 रुपयांची मागणी केली आहे. या रकमेची तरतुद शासनाला अंदाजपत्रकात करावी लागणार आहे. त्यासाठी मंत्रीमंडळाच्या कॅबिनेटची मंजुरी अत्यावश्यक आहे.
फेब्रुवारी अखेरीस आणि मार्च महिन्याच्या सुरवातीला 2014-15 या वर्षामध्ये अवकाळी पाऊस झाला होता. त्यावेळी आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाने पूर्ण जिल्हा महसूल विभागाकडून बाधित म्हणून जाहीर केला होता. या हंगामात अनेक शेतकर्यांची बँक खाती एनपीएत गेल्यामुळे जप्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागले. तेव्हा बागायतदारांनी कर्जमुक्तीची मागणी केली. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी आणि कर्ज पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही. यासंदर्भात सात वर्षे बागायतदार पाठपुरावा करत होते. 9 फेब्रुवारी 2023 ला पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सरसकट कर्जावरील तीन महिने व्याजमाफीचे प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक विभागाने बँकांकडून आलेल्या माहितीनुसार 12 हजार 513 बागायतदारांचे 3 कोटी 35 लाख 93 हजार 178 रुपयांचे प्रस्ताव शासनाला सादर केले आहेत. याला शासनस्तरावरुन तरतूद करण्याचे आश्वासन दोन आठवड्यांपुर्वी रत्नागिरी दौर्यावर आलेले कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी बागायतदारांना दिले होते. शासनाला प्रस्ताव सादर झालेला असल्यामुळे व्याजमाफी केव्हा होणार याकडे बागायतदारांचे लक्ष लागले आहे. यंदाचा हंगामही यथातथाच गेल्यामुळे बागायतदार अडचणीत असून बँक कर्ज, औषधांचा खर्च फेडणे अशक्य होणार आहे. या कालावधीत व्याजमाफी झाली तर थोडा दिलासा मिळू शकतो.
दरम्यान, शासनाला सादर केलेल्या प्रस्तावात जिल्हा सहकारी बँकेतील 767 प्रस्ताव आणि 15 लाख 34 हजार रुपये, विदर्भ कोकण बँक 2 हजार 740 लाभार्थींचे 47 लाख 19 हजार 508, बँक ऑफ इंडियातील 7 हजार 497 लाभार्थींचे 1 कोटी 69 लाख, बँक ऑफ महाराष्ट्रतील 669 प्रस्ताव आणि 51 लाख 27 हजार रुपये, एसबीआयचे 317 लाभार्थी आणि 23 लाख 91 हजार रुपयांचे व्याज माफी करावी लागणार आहे.