
रोजगार मेळावा २३ ऐवजी २४ मे रोजी
रत्नागिरी:- शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच जिल्हा उदयोग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा येत्या २३ मे रोजी होणार असल्याचे जाहीर झाले होते. मात्र तो एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. रत्नागिरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवारी, २४ मे रोजी सकाळी १० वाजता मेळाव्याला प्रारंभ होईल.
या मेळाव्याकरिता विविध खासगी आस्थापनांकडून ५०० हून अधिक रिक्त पदांची मागणी करण्यात आली आहे. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, इंजिनिअर आणि इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या जास्तीत जास्त तरुणांनी लाभ योजनेचा घ्यावा. मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता बायोडेटा आणि इतर कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे.मेळाव्याच्या बदललेल्या तारखेविषयी तसेच अधिक माहितीकरिता या कार्यालयाच्या (०२३५२) २२१४७८ किंवा २९९३८५ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.