
रत्नागिरी पालिकेच्या नवीन इमारतीसाठी ५ कोटी
काम वेगात होणार ; संपूर्ण इमारत वातानुकूलित
रत्नागिरी :पालिकेच्या नवीन इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. चौदा कोटीच्या अद्ययावत इमारतीसाठी पाच कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात इमारतीचे काम पूर्ण होईल, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.
पालिकेची जुनी इमारत पूर्ण जीर्ण झाली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ती धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे नवीन इमारतीचा निर्णय गेल्या सत्ताधाऱ्यांनी गेला. वैशिष्ट्यपूर्ण निधीतून नवीन इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. तत्कालीन नगराध्यक्ष राहूल पंडित आणि त्यानंतरचे नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांच्या कालावधीत हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी नगरविकास मंत्र्याशी चर्चा करून चौदा कोटी रुपयांचा निधी यासाठी शासनाकडून मंजूर करून आणला. मंजूर निधीपैकी पाच कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात पालिकेला आला आहे.
इमारतीच्या तळात वाहनतळ, त्यावर तळमजला आणि वर दोन मजले, अशी इमारतीची रचना करण्यात येणार आहे. तिसऱ्या मजल्यापर्यंत काम आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यामुळे उर्वरित कामे लवकरात लवकर होणार आहेत. या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. ही इमारत या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. शासनाकडून दोन टप्प्यांत निधी मिळाला आहे. ही इमारत पूर्णतः वातानुकूलित उभारली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.