बापूजींच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच खरी आदरांजली!
छ. शिवाजी हायस्कूल, झाडगाव येथे डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
रत्नागिरी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी प. पू. डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ३९ व्या स्मृतिदिनानिमित्त छ. श्री शिवाजी हायस्कूल, झाडगाव- रत्नागिरी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. सुतार सर यांच्या हस्ते बापूजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून त्यांच्या महान कार्याला आदरांजली वाहिली. स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांची रत्नागिरी शहरातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. “अमर रहे, अमर रहे, बापूजी साळुंखे अमर रहे!” या घोषणांनी शहराचा परिसर दुमदुमून गेला. रॅलीमध्ये झांज पथक व लेझीम पथकाने सादर केलेल्या आकर्षक प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभागी होत बापूजींच्या कार्याचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविला.
यानंतर आयोजित कार्यक्रमात कु. गावित, कु. पार्थ रतुनावर आणि कु. सोहम खोत या विद्यार्थ्यांनी भाषणातून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग व शैक्षणिक कार्याला उजाळा दिला. बापूजींनी सर्वसामान्य व ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून दिली.
यावेळी शिक्षक मनोगतामध्ये क्रीडाशिक्षक एम. डी. पाटील सर, श्री. सुतार सर आणि नवनाथ जाधव सर यांनी बापूजींच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार” या बापूजींच्या विचारांचा वारसा प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे न्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बापूजींनी शिक्षणाला केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन न मानता संस्कारक्षम, शिस्तप्रिय, कर्तृत्ववान आणि सामाजिक जाणीव असलेली पिढी घडविण्याचे माध्यम मानले. त्यांच्या या व्यापक शैक्षणिक दृष्टिकोनाची प्रेरणा विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात घेणे हीच त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली ठरेल, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास क्रीडाशिक्षक एम. डी. पाटील सर, नवनाथ जाधव सर, सौ. शितूत मॅडम, श्री. मंडले सर, श्री. सावंत सर, श्री. सनगरे सर, श्री. बागडी सर, श्री. फगरे मामा, श्री. पवार मामा तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमामुळे प्रशालेत प्रेरणादायी, संस्कारमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून बापूजींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार सौ गौरी शितूत मॅडम यांनी मानले. क्रीडाशिक्षक एम. डी. पाटील सर, नवनाथ जाधव सर, श्री. मंडले सर, श्री. सावंत सर, श्री. सनगरे सर, श्री. बागडी सर, श्री. फगरे मामा, श्री. पवार मामा तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.