जिल्ह्यात तीन महिन्यांचे रेशन धान्य एकाचवेळी मिळणार
रत्नागिरी: पावसाळ्यात वाहतूक आणि साठवणुकीसंदर्भात उद्भवू शकणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांचे रेशन धान्य आगावु उचलून त्याचे वितरण ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनो पावसात भिजत रांगेत उभारून धान्य घेण्याची गरज भासणार नाही.
पावसाळ्यातील वाहतुकीची कोंडी आणि साठवणुकीदरम्यान धान्याचे होणारे नुकसान लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, धान्य आगावू वितरित करताना प्रत्येक महिन्याचे व्यवहार आणि ई-पॉस मशिनवरील प्रमाणीकरण स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. दरम्यान, शासकीय गोदामातून धान्य उचलण्यापूर्वी त्याची गुणवत्ता योग्य आहे का नाही, याची तपासणी कंत्राटदार, अधिकारी तपासणार आहेत. किती धान्याची उचल झाली आणि रेशन दुकानांमधून किती वाटप झाले, याची माहिती दररोज सायंकाळी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
…तर कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई
गोदामातून रेशन दुकानांपर्यंत धान्य पोहोचवणाऱ्या कंत्राटदारांने वाहतुकीत जाणीवपूर्वक विलंब केल्यास किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाणार आहे.