श्वान निर्बिजीकरण केंद्राचे काम वादाच्या भोऱ्यात
माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांची तक्रार
रत्नागिरी : श्वान निर्बिजीकरण केंद्रासाठी सुरू असलेल्या इमारत बांधकामावर गंभीर आक्षेप घेत माजी नगराध्यक्ष मिलिंद कृष्णकांत कीर यांनी नगरपरिषद प्रशासन संचालनालय तसेच रत्नागिरी नगरपरिषद यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. शिक्षण मंडळाच्या जागेवर सुरू असलेले हे बांधकाम पूर्व प्रशासकीय मंजुरी व निविदा प्रक्रियेशिवाय सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दि. 2 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या नगरपरिषद सभेमध्ये हा विषय उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी कामाच्या कायदेशीरतेबाबत प्रश्न उपस्थित केला. सभेमध्ये प्रशासनाने अद्याप या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचे मान्य केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित कंत्राटदार कोण, काम कोणाच्या आदेशाने सुरू झाले, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
स्थळावर प्रत्यक्ष बांधकाम सुरू असल्याचे छायाचित्रांद्वारे निदर्शनास येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, पूर्व प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मान्यता, अर्थसंकल्पीय तरतूद व निविदा प्रक्रिया या अनिवार्य टप्प्यांची पूर्तता न करता काम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यापूवही ‘आधी काम नंतर मंजुरी’ पद्धतीने काही कामे करण्यात आल्याबाबत आक्षेप नोंदविण्यात आल्याचे कीर यांनी नमूद केले आहे. या प्रकरणामुळे सार्वजनिक निधीचा संभाव्य अनधिकृत वापर, आर्थिक अनियमितता व पारदर्शकतेचा अभाव असे गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर कामाची तात्काळ स्वतंत्र चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत बांधकाम स्थगित करावे, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाकडे आता नागरिकांचेही लक्ष लागले असून, प्रशासनाची भूमिका काय राहणार, याकडे उत्सुकता आहे.