स्थगिती असतानाही ‘निवारा केंद्रा’चे ७० टक्के काम पूर्ण
नगरसेवक केतन शेट्ये, अमित विलणकर आक्रमक; पालिकेतील गोंधळाची स्थिती चव्हाट्यावर
रत्नागिरी: रत्नागिरी पालिकेच्या बाजूलाच जयस्तंभ येथील जुन्या शिक्षण मंडळाच्या जागेत निवारा व निर्जंतुकीकरण केंद्राचे काम सुरू आहे. सुमारे ४८ लाखांचे हे काम असून, त्याला स्थगिती असतानाही ते ७० टक्के काम पूर्ण झाले आहे आणि अजूनही सुरू आहे. या विकास कामाचा ठेकेदार कोण हेदेखील पालिकेला माहीत नाही. एवढा प्रशासनाचा ढिसाळ कारभार सुरू असल्याची प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक केतन शेट्ये आणि अमित विलणकर यांनी व्यक्त केली.
निवारा केंद्रात रूपांतर या कामांसाठी एकूण ५९,२४३ रुपये इतके अंदाजपत्रक तपासणी शुल्क भरल्यानंतर प्रत्यक्ष कामाचे मार्ग मोकळे होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. ४ कडून मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेने पाठवलेल्या प्रस्तावांची छाननी करून काही अटी व शर्तीच्या अधीन राहून ही मंजुरी देण्यात आली आहे. निवारा व निर्जंतुकीकरण केंद्राचे काम जयस्तंभयेथील शिक्षण मंडळाच्या इमारतीची दुरुस्ती करून त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात केंद्र तयार करण्यात येणार आहे. यासाठी ४७ लाख ३९ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली आहे.
या कामाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेची कोणताही परवानगी नाही. तसेच कामाला स्थगिती देण्यात आली होती, तरी ठेकेदाराने हे काम सुरू ठेवून आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ठेकेदार कोणाच्या आशीर्वादाने हे काम करत आहे? अशी चर्चा सुरू आहे.
पुढील सभेत धारेवर धरणार
अचंबित करणारी गोष्ट म्हणजे या सुमारे ४८ लाखांचे काम कोण ठेकेदार करत आहे हे पालिकेलाच माहिती नाही. या कामाबाबत आम्ही पुढील सभेमध्ये प्रशासनाला धारेवर धरू, असे नगरसेवक केतन शेट्ये आणि अमित विलणकर यांना सांगितले.