१.३७ लाख वाहनांना लागली हायसिक्युरिटी नंबरप्लेट
उर्वरित २५ टक्क्यांवर होणार दंडात्मक कारवाई.
रत्नागिरी ः जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३७ हजार ५७१ वाहनांनी ‘हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) नंबरप्लेट बसवली आहे तर १४ हजार ३६४ जणांनी बुकिंग केले आहे. वाहनचालकांनी वेळीच नंबरप्लेट बसवून कारवाई टाळावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत दिली होती; मात्र, नगरपालिका, नगरपंचायती आणि त्यानंतरच्या महापालिका निवडणुका आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे अद्याप ज्यांनी एचएसआरपी बसवली नाही त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे; परंतु निवडणुकीनंतर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ७५ टक्के वाहनांनी ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसवली आहे. रत्नागिरी जिल्ह्याची कामगिरी राज्यात अव्वल आहे. याबाबत परिवहन आयुक्तांनी रत्नागिरीचे विशेष अभिनंदन केले आहे; मात्र भविष्यात वाहनधारकांवर वायूवेग पथकाद्वारे कारवाई केली जाणार असून, त्यांना पाच हजारांचा दंड भरावा लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.