हातखंबा तिठ्यावर नवे दोन्ही हायमास्ट बंद
अंधारात नागरिक; वाढत्या चोरीच्या घटनांनी निर्माण केली भीती
रत्नागिरी /प्रतिनिधी
तालुक्यातील हातखंबा भागातील महामार्गाच्या दुतर्फा झगमगाट करणारे दिवे असावेत अशी अपेक्षा असताना, हातखंबा तिठ्यावर बसविण्यात आलेले नवे दोन्ही हायमास्ट दिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. परिणामी रात्रीच्या वेळी या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरते असून, एस.टी. प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांना अक्षरशः काळोखात प्रवास करावा लागत आहे.
हा तिठा अत्यंत गर्दीचा असून तीन प्रमुख रस्ते येथे एकमेकांना जोडतात. महामार्गाचे काम या भागात पूर्ण झाले असले तरीही हायमास्ट सुरू करण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. सुरुवातीला काही दिवस हे दिवे कार्यान्वित ठेवण्यात आले होते; मात्र त्यानंतर ते अचानक बंद अवस्थेत गेले. दरम्यान, हातखंबा परिसरात मागील काही दिवसांत तब्बल तीन चोरीच्या घटना घडल्या असून चोरटे अजूनही फरार आहेत. अशा परिस्थितीत चौकातील हायमास्ट बंद असल्याने रात्रीच्या वेळी गुन्हेगारी कृतींना उत्तेजन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महामार्ग प्राधिकरण विभागाने इतक्या महत्त्वाच्या चौकातील हायमास्ट बंद ठेवून दुर्लक्ष का करत आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संबंधित विभागाने तातडीने या हायमास्ट दिव्यांची दुरुस्ती करून ते कार्यान्वित करावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.