अश्विनी मोरे यांना महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग यांचा मानाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार २०२०-२१ घोषित
रत्नागिरी : श्रीमती अश्विनी पवनकुमार मोरे यांना महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग मार्फत महिला व बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार २०२०-२१ जिल्हास्तरीय पुरस्कार घोषित झाला आहे.या यशामुळे सामाजिक क्षेत्र तसेच विविध स्तरावरून अश्विनी ताई यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.
अश्विनीताई पहिली – दुसरीच्या वर्गात असल्यापासून गावोगावच्या जत्रा मेळाव्यातून उत्तम गाणी गाऊन व नाचून भाकर या संस्थेच्या उभारणीच्या काळात मदत करत असत. ज्यातून संस्थेच्या स्वयंसेवकांच्या जेवणासाठीच्या खर्चाचा काही भाग हलका व्हायचा. ह्याच अश्विनी ताई पुढे संस्थेच्या प्रत्येक कार्य हिरीरीने भाग घेऊ लागल्या. आई स्वर्गवासी.अरुणा पाटील हिने समाजसेवा करीत महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त करताना केलेल्या समाजसेवेची व परिश्रमाची जाण मनात ठेवून आईचा वारसा चालवण्याचा ध्यास त्यांनी मनात ठेवून संस्थेच्या कामकाजाला गती दिली. संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी १५ पदयात्रा काढल्या. महिला बचत गट ,माता व बाल संगोपन ,गुजरात भूकंप, दुष्काळ मधील चारा छावनी, कोविड 19, चिपळूण पूर तसेच महिलांचे 35 हुन जास्त महिला मेळावे घेतले, पुढे जाऊन महिला पुनर्वसन केंद्र व आजी आजोबा चा गाव आदी प्रकल्प उभे करून स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केले.
शिक्षणातही त्या मागे राहिलेल्या नव्हत्या संस्थेचे काम करीत त्यांनी वाणिज्य शाखेची मुंबई विद्यापीठातून प्रथम वर्गाची पदवी मिळवलेली. पुढे एम.एस.डब्ल्यू ही समाजसेवेची पदवीत्तर पदवी मिळवली पुढील तीन वर्ष म्हाडामध्ये झोपडपट्टी विकास कार्यक्रमात काम केले. बाहेर उत्तम पगाराच्या नोकरीची संधी उपलब्ध असूनही आजही अल्पशा मानधनावर त्या समाजसेवेचे कार्य करीत आहे.
सन २०१२ मध्ये पुन्हा भाकर या आई-वडिलांनी स्थापन केलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कोकणातील गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करावे याचे ध्येय उराशी बाळगून त्यांनी कामाला सुरुवात केली. संस्थेच्या समुपदेशक, केंद्र्प्रशासक, केंद्र समन्वयक म्हणून काम करीत आजवर आठशे हून अधिक पीडित महिलांना मदत केली. तसेच अश्विनीताई यांनी विविध स्तरावर कार्य करीत आहेत त्यात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक- महाराष्ट्र राज्य महिला आयोग , मुंबई, केंद्रप्रशासक- सखी वन स्टाँप सेंटर, रत्नागिरी, सदस्य- POSH कमिटी G.F. कंपनी, सदस्य- व्यसनमुक्ती समिती, जिल्हाधिकारी कार्यालय,रत्नागिरी. सदस्य – posh कमिटी जिल्हा महिला व बाल विकास विभाग रत्नागिरी आदी पदावर अश्विनी ताई कार्यरत आहेत.
भाकर गेली ३२ वर्ष कोकणात अविरत काम करणारी संस्था असून संस्थेच्या सचिव पदाची जबाबदारी अश्विनीताई यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. संस्था शासनाचा स्वच्छ भारत मिशन, आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण प्रकल्प, महिला व बालकांसाठी समुपदेशन केंद्र ,पाणलोट विकास कार्यक्रम, हस्तकला कारागिरांचे प्रशिक्षण प्रकल्प, सखी सेंटर, सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास अहवाल ,वृद्धाश्रम (आजी-आजोबांचे गाव) महिला पुनरुत्थान केंद्र इत्यादी प्रकल्प कार्यक्रम राबवीत आहे.
भविष्यात समाजशास्त्र महाविद्यालय, रात्र महाविद्यालय, आयुर्वेदिक हॉस्पिटल सुरू करण्याच्या तयारीला अश्विनीताई लागल्या आहेत.