
जिल्ह्यात महावितरणचे २८ हजार ९८० ग्राहक बाधित
रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील पावसाचा फटका ; विद्युत पुरवठा पूर्ववत
रत्नागिरी : जिल्ह्यात गेली चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. वादळीवारा व पावसामुळे कोकण परिमंडळातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागातील एकूण २२१ गावांतील ९८ हजार ४०० वीजग्राहकांना बाधित होऊन त्यांना काळोखात राहण्याची वेळ आली. परंतु महावितरणकडून युद्धपातळीवर केलेल्या उपाययोजनांमुळे कालपर्यंत ९७ हजार ९७० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला होता.
जिल्ह्यात १५ ते १६ जून या कालावधीत दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग विभागालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले. या झालेल्या वादळीवारा व पावसामुळे जिह्यातील अनेक ठिकाणी पडझड झाली. झाडे उन्मळून पडली, दरड कोसळली, घरे पडली, असे मोठे नुकसान झाले. या मुसळधार पावसाचा महावितरण कंपनीलाही मोठा फटका बसला आहे. यामुळे महावितरणचे हजारो ग्राहक बाधित झाले. रत्नागिरी विभागात ८३ गावे बाधित झाली होती. त्यामुळे २८ हजार ९८० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तो पूर्ववत करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर काम करण्यात आले. या पावसामुळे बाधित झालेले ३ डिटीसी पूर्ववत करण्यात कार्यवाही झाली. उच्च दाब वाहिन्यांचे ७ वीजखांब पूर्ववत करण्यात आले. तसा लघुदाब वाहिन्यांचे ३१ वीज खांबांपैकी २८ खांब पूर्ववत करण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग विभागातही १३८ गावे बाधित झाली होती.