
तब्बल ३५ वर्षांनंतर आडिवरे येथील महाकाली मंदिरात पुराचे पाणी
राजापूर (प्रतिनिधी):
राजापुरात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारी सायंकाळपासून तालुक्यात पडलेल्या धुंवाधार पावसाने राजापूर शहरासह ग्रामीण भागाला चांगलाच दणका दिला आहे. या मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला असून मध्यरात्री या पुराच्या पाण्याने पिकअप शेड लगतच्या गणेश वडापाव स्टॉल पर्यत धडक मारली होती. तर या वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील आडिवरे येथील प्रसिध्द श्री महाकाली देवी मंदिर परिसरात पाणी शिरले होते. तब्बल ३५ वर्षांनंतर या परिसरात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
भालावली, धाऊवल्ली, कशेळी, नवेदर, कोतापूर या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून त्यांचे नुकसान झाले आहे. तर धाऊलवल्ली भाटलेवाडी येथील वहाळावरील पुल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. तर राजवाडी वाडा भराडे येथील रस्त्यावर दरड कोसळली आहे. कोतापूर, भू परिसरात सुपारींच्या बागाचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी जिल्हात पावसाची सर्वाधिक नोंद राजापूर तालुक्यात झाली असून तब्बल ११९.८७ मि. मी. इतका पाऊस झाला आहे. या पावसात रस्ते, पुल यांची पुरती दुरावस्था झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झ्राले आहे. या पावसामुळे काही भागात विजपुरवठाही खंडीत झाला आहे. काही भागात तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची माहीती आहे.
तालुक्यात मुसळधार स्वरूपात पडलेल्या या पावसामुळे प्रशासकिय यंत्रणा अधिक सतर्क झाली असून प्रांताधिकारी डॉ. जॅसमीन यांनी तालुक्यातील सर्व नुकसानीचे २४ तासात पंचनामे करून अहवालर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर तहसीलदार विकास गंबरे यांनी गाव व वाडीवस्तीवरील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यासाठी मंडळ अधिकारी, महसुल ग्राम अधिकारी, ग्रामसेविकास अधिकारी, यांसह कृषी विभागाला निर्देश दिले आहेत.
बुधवार पासून राजापूरात पावसाने संततधार धरली आहे. त्यामुळे शहरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांसह ग्रामीण भागातील नदी नाले तुडुंब भरून वहात आहेत. गुरूवारी सायंकाळीही तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. मात्र रात्री पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र शुकव्रारी सकाळपासूनच पावसाने रिपरिप धरली होती. सायंकाळी पाच नंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला आणि शहरासह ग्रामीण भागाला या पावसाने चांगलेच झोडपून काढले.
या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे शहरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास या पुराच्या पाण्याने जवाहर चौकाकडे कुच करत गणेशवडा पाव सेंटर पर्यंत धडक मारली होती. त्यामुळे नदीकिनारी असणारे व्यापारी व नागरीक धास्तावले होते. मात्र पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने पाणी हळू हळू ओसरले.
या पावसाचा सर्वाधिक तडाखा तालुक्यातील पश्चिमेकडील भागाला बसला आहे. राजापूर तालुक्यातील आडीवरे येथील प्रसिध्द अशा श्री देवी महाकाली मंदिरा परिसरातही पाणी शिरले होते. या ठीकाणी असलेली गटारे पुर्णपणे बुजल्याने आणखीनच याचा फटका बसला आहे. या भागातील नदीलाही मोठा पूर आला होता. याचा फटका व्यापारी व ग्रामस्थांना बसला आहे.
भालवली परिसरात काही घरांमध्ये नदीला आलेल्या पुरांचे पाणी शिरले होते. काही घरांमध्ये सुमारे चार ते पाच फूट पाणी शिरल्याची माहिती आहे. राजवाडी वाडा भराडे या ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळली आहे. भालावली मिरवणेवाडी येथे दरड कोसळून गावात जाणारा रस्ता बंद झाला आहे. मोगरे सडेवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळली आहे. धाऊलवल्ली भाटलेवाडी येथे पुल वाहून गेला आहे. तर नवेदर येथील दिनेश पांचाळ यांच्या घरात पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले आहे. भालावली येथे अनेक घरे, मंदिर तसेच सार्वजनिक रस्त्यांचे या पावसात नुकसान झाले आहे. भालावली येथील मिलिंद आडवीरकर यांच्या घरात पुराचे पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाडा तिवरे येथे मधुकर गावकर यांच्या घरालगत दरड कोसळुन नुकसान झाले आहे. तर धाऊलवल्ली ग्रामपंचायतीचेही नुकसान झाले आहे.
या मुसळधार पावसाचा तडाखा कोतापूर गावालाही बसला आहे. या पावसामुळे काही रस्त्यांचे नुकसान झाले आहे. कोतापूर वड ते एकवीरा देवी मंदिर या मार्गावरील नुकत्याच झालेल्या डांबरी रस्त्याची अवस्था या पावसाने अक्षरशः दयनीय झाली आहे. पावसाच्या जोरदार प्रवाहाने रस्त्याचे डांबर उखडले गेले असून, ठिकठिकाणी खड्डे आणि खाचखळगे निर्माण झाले आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गावकऱ्यांच्या दैनंदिन वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
गावातील कही घरांच्या अंगणात आणि काही घरांमध्येही पाणी शिरले आहे. रिजवान मोनये यांच्या गॅरेजमध्ये व्हाळीची मोरी चोंदल्याने मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. यामुळे गॅरेजमधील सामानाचे नुकसान झाले आहे. संकटाच्या या क्षणी गावकऱ्यांनी एकजुटीने पुढाकार घेतला. संतोष नवरे, गौरव नवरे, विवेक प्रभुघाटे, अरुण दीक्षित, विनायक प्रभुघाटे आणि वैभव नवरे यांनी गॅरेजमधील सामान बाजूला हलवण्यासाठी मदत केली.
कोतापूर लक्ष्मी केशव मंदिरा खालील करप्याच्या आगरातील एक नंबर शाळे पर्यंत जाणारा पक्का पूलाचे नुकसान झाले आहे. या पावसाने पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, गावकऱ्यांना, शाळेतल्या मुलांना याचा खूप त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच, ओंकार प्रभुघाटे यांच्या गारगेश्वर मंदिरासमोरील आगराचा संपूर्ण गडगा पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. ज्यामुळे शेती आणि परिसरातील जमिनींचेही नुकसान झाले आहे.
गंगाराम जाधव यांच्या काजू फॅक्टरीजवळील विहिरी समोरील कुंपणाची रांगही या पावसात मोठ्या प्रमाणात कोसळली आहे. या नुकसानीमुळे काजू फॅक्टरीच्या परिसरात मोठा धोका निर्माण झाला असून, येथील व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कोतापूर, भू व परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार झ्रालेंल्या पावसामुळे सुपारी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या सुपारी बागेतील सुपारीची झाडे मोडून पडली आहेत.
सोलगाव देवाचे गोठणे रस्त्यावरील मोरी खचली असून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तर सागवे नाखरे येथील हरी सिताराम नार्वेकर यांच्या घराची भिंत कोसळुन नुकसान झाले आहे. तर धाऊलवल्ली पोकळेवाडीतून जाणारा रस्ता खचला आहे. भालावली ग्रामपंचायत नजीक चिऱ्याचे बांधकाम कोसळले असून पिकअपशेडची इमारत देखिल कोसळली आहे. तसेच धाऊलवल्लीतील नवलादेवी मंदिरात पुराचे पाणी शिरल्याने देवळातील पूजा साहित्य व मौल्यवान साहित्याचे नुकसान झाले आहे.
महावितणला फटका 10 ते 15 पोल पडले
शुक्रवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलगाव- 2 कुळेवाडी 2 कोतापूर 2 देवाचे गोठणे 1 मांडवकरवाडी 1 तरळवाडी, कुंभवडे गावात विजपोल पडले आहेत. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.