
देवरुख पोलिसांकडून गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई; ३ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त
देवरुख: रत्नागिरी जिल्ह्यात गोवंश वाहतूक आणि कत्तल संदर्भातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी दिलेल्या सूचनेनुसार देवरुख पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या एका इसमावर गुन्हा दाखल करत, ३ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुरुवारी (दि. १३/०६/२०२५) रात्री ८.३५ वाजण्याच्या सुमारास देवरुख पोलीस ठाणे हद्दीतील साखरपा पोलीस दूरक्षेत्र अंतर्गत मूर्ती चेकपोस्ट येथे नियमित गस्तीवर असताना, एक संशयित बोलेरो पिकअप वाहन (क्र. MH-08-M-4929) येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. देवरुख पोलीस पथकाने तत्काळ हे वाहन थांबवून पिकअपच्या हौद्याची तपासणी केली असता, त्यामध्ये दोन बैल अत्यंत अमानुषपणे, जवळजवळ बांधलेले आढळून आले.
वाहनावरील चालक सागर नामदेव पाटील (वय ३१, रा. पिशवी, केळेवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) आणि इतर इसमांची अधिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. सागर पाटील याने आपल्या वाहनात दोन गोवंश जनावरांना हालचाल करता येणार नाही अशा प्रकारे, त्यांना वेदना होतील अशा आखूड दोरीने मानेला बांधले होते. गाडीचा हौदा चारही बाजूंनी ताडपत्रीने बंदिस्त केला होता, तसेच गुरांना दुखापत होऊ नये म्हणून विभाजन केले नव्हते आणि त्यांची वैद्यकीय तपासणीही केली नव्हती. ही गुरे खरेदी-विक्रीचा तसेच वाहतुकीचा परवाना नसताना, आरोपी प्रदीप अरुण लाटवडेकर (रा. पिशवी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) आणि बैल मालक आरोपी नागेश कदम (रा. देवरुख, बौद्ध वाडी) यांच्या सांगण्यावरून कत्तल करण्याच्या उद्देशाने अवैधपणे वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६६/२०२५ नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५ (अ), ५ (ब) व ९ सह प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१), (घ), (ङ), (च) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ सह मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ६६/१९२, ३/१८१ प्राण्यांची वाहतूक नियम १९७८ चे कलम ४७,४८,४९,५०,५१,५४,५६ आणि भा. न्या. सं. २०२३ चे कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून, आरोपी सागर नामदेव पाटील याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ३५(३) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. तसेच, आरोपी प्रदीप अरुण लाटवडेकर आणि बैल मालक नागेश कदम यांच्यावरही देवरुख पोलीस ठाण्यामार्फत कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, आरोपी नागेश कदम याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हा रजिस्टर नंबर १०३/२०२४ नुसार बी.एन.एस. २०२३ चे कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१,३३३, १८९(२), १८९(४), १९० अन्वये गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कारवाईत ३,५०,०००/- रुपये किमतीची एक सफेद रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी, १३,०००/- रुपये किमतीचा एक बैल आणि १०,०००/- रुपये किमतीचा एक बैल असा एकूण ३,७३,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गोवंश बैलांची सुटका करण्यात आली आहे.
ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा श्री. यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. महेश तोरसकर, पो.उ.नि. श्री. नामदेव जाधव, पो. हवा/१०२७ श्री. नितीन जाधव, पो. हवा/१५५१ श्री. संजय करांडे, पो. कॉ/१६०७ श्री. सुहास लाड, पो. कॉ/५५६ श्री. तानाजी पाटील आणि पो. को/१३५९ श्री. तुळसणकर (पोलीस मुख्यालय रत्नागिरी) यांनी केली आहे.