
रत्नागिरीत सलग चौथ्या वर्षी निघणार आषाढीवारी
रत्नागिरी : येथे सलग चौथ्या वर्षी शक्ती मंदिर ते भक्ती मंदिर या संकल्पनेवर आधारित आषाढीवारी निघणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे ६ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजता मारुती मंदिर येथून वारीला सुरवात होईल. मारुती मंदिराने याचे आयोजन केले आहे. या वारीच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.
या वेळी रुची महाजनी, केवल सप्रे, नंदू चव्हाण, विराज चव्हाण, अॅड. अतुल नवरे, सौ. राधा चव्हाण, सुहास ठाकुरदेसाई, वैभव पांचाळ, जयदीप साळवी, अॅड. अमित काटे आदी उपस्थित होते.
वारी माळनाका, एसटी स्टॅंडमार्गे, राम आळीतून बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात पोहोचणार आहे. पारंपरिक वेशभूषेत, टाळमृदंग घेऊन आणि तुळशीवृंदावन डोईवर घेऊन हजारो वारकरी वारीत सहभागी होणार आहेत. अनेक वर्षे विठुरायाच्या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या परंतु काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपूरला वारीत जाणे शक्य नसल्याने गेल्या तीन वर्षापासून रत्नागिरीमध्ये आषाढी वारीचे आयोजन करण्यात येत आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत विठु माऊली आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पंढरीची वारी. आषाढी एकादशी आली की वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागते. या वारीला जवळपास ८०० वर्षांची परंपरा आहे. आयुष्यात एकदा तरी वारी घडावी अशी माणसाची मनोमन इच्छा असते. प्रापंचिक समस्या, व्यावहारिक अडचणी, शारीरिक मर्यादा यामुळे वारीला जाणं होत नाही. त्यामुळे मनातली वारीची ओढ कमी होत नाही. असे अनेक वारकरी रत्नागिरीतल्या वारीत सहभागी होतात.
वारीचा मार्ग मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर असा आहे. वारीला सकाळी ६.३० वाजता सुरवात होणार आहे. अभंग, नामजप, नित्यपाठ, विठुनामाचा जयजयकार करत ही वारी निघणार आहे. वारकरी, भाविकांनी बहुसंख्येने पारंपरिक वेशात, टाळ- मृदुंग, पताकांसह सहभागी होत वारीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आषाढीवारी आयोजकांनी केले आहे.