
लांजातील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
लांजा : लांजा शहरातील कीर्तिमहल हॉटेलसमोर चक्कर येऊन पडलेल्या एका ४५ वर्षीय तरुणाचा रत्नागिरी येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. मिलिंद पांडुरंग दळवी (वय ४५, रा. गोठस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना ६ जून रोजी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास घडली असून, ११ जून रोजी सायंकाळी ६.२३ वाजता या घटनेची नोंद घेण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी दुपारी मिलिंद दळवी हे लांजा येथील कीर्तिमहल हॉटेलसमोर अचानक चक्कर येऊन खाली पडले. हॉटेलमधील लोकांनी तातडीने त्यांना डॉ. खानविलकर यांच्याकडे उपचारासाठी नेले. त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय लांजा येथे दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, अधिक उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले.
सिव्हिल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, त्यांची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. दळवी यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.