
गणेशगुळे समुद्रात झेपावली ऑलिव्ह रिडलेची 388 पिल्ले
रत्नागिरी : ऑलिव्ह रिडले कासवाच्या जातीचे अस्तित्व कमी होत असताना त्याचे संवर्धन करण्याचे काम रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक किनार्यावरती केले जात आहे. यातील गणेशगुळे समुद्रकिनार्यावरती यावर्षी 21 घरट्यांचे संवर्धन करण्यात आले होते. त्यातून 388 पिल्ले समुद्रामध्ये सोडण्यात आली.
गेली दोन वर्षे गणेशगुळे समुद्रकिनार्यावरती कासवांनी अंडी घालण्यास सुरुवात केली आहे. कारण त्यांना हा परिसर सुरक्षित वाटू लागल्यामुळे अंडी घालण्याचे प्रमाण या किनार्यावरती वाढल्याचे दिसून येत आहे. तिसर्या वर्षी या किनार्यावरती कासवाची 21 घरटे तयार झाली होती व ती संरक्षित करण्याचे काम कासव मित्र सचिन तोडणकर यांनी केली आहे. या 21 घरट्यांच्या माध्यमातून मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांमध्ये 388 कासवाच्या पिल्लांनी समुद्राकडे झेप घेतली. त्यामुळे हा परिसर यापुढेही अंडी घालण्यास अनुकूल असल्याचे चित्र तयार झाले आहे. यासंदर्भात कासव मित्र सचिन तोडणकर म्हणाले की, गेली दोन वर्षें या किनार्यावरती कासवांनी अंडी घालण्यास सुरुवात केली. त्याचे संवर्धन करण्याचे काम करण्यात आले. त्यामुळेच यावर्षीही चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळाला, परंतु हीच अंडी संरक्षित करीत असताना हाताळल्यामुळे काही अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पूर्ण क्षमतेने ती तयार होत नाहीत. त्यामुळे सुदृढ कासवाची पिल्ले तयार होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळेच हे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले.
तसेच गेली अनेक वर्षे गावखडी कासव संवर्धन केंद्रामध्ये अंड्यांचे संरक्षण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे याठिकाणी अनेक पर्यटक या विणीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात पर्यटक या किनार्यावरती भेट देत असतात. यावर्षी या किनार्यावरती 153 घरट्यांच्या माध्यमातून 5000 पिल्लांनी समुद्राच्या दिशेने झेप घेतली. त्यामुळे या कासव संवर्धन केंद्रामध्ये चांगल्या प्रकारे संवर्धन केल्यामुळेच या किनार्यावरती कासवे मोठ्याप्रमाणात अंडी घालत आहेत. यावर्षी पावसाने अचानकपणे सुरुवात केल्यामुळे कासवांच्या विणीचा हंगाम संपुष्टात आला आहे.