
कळंबस्ते रेल्वे फाटक दिवसात ३४ वेळा होतो बंद
चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावर जिल्ह्यातील एकमेव चिपळूण कळंबस्ते रेल्वे फाटक असून हे फाटक दिवसभरात ३४ फेऱ्यांसाठी बंद ठेवावे लागते. याठिकाणी उड्डाणपुल उभारण्याची मागणी ३२ वर्षे केली जात आहे. त्याप्रमाणे सुमारे २० कोटी ५२ लाखाच्या निधीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र अद्याप निधीची तरतूद होत नसल्याने चिपळूणसह खेड पंधरागावच्या प्रवाशांचा नियमित खोळंबा होत आहे.
तालुक्यातील कळंबस्ते रेल्वे फाटकाला सुरुवातीपासूनच विरोध केला जात आहे. या फाटकामुळे चिपळूण व खेड तालुक्यातील २१ गावं अडचणीत आली आहेत. यामध्ये चिपळूण हद्दीतील कळंबस्ते, नवीन कोळकेवाडी, दळवटणे, खांदाटपाली, निरबाडे, मोरवणे तसेच खेड हद्दीतील आंबडस, चिरणी, भेलसई, केळणे, काडवली, कुंबवली, मुसाड, वावे, कुरवळ खेड, कुरवळ जावळी, धामणंद, कासई, सापेर्ली, तळवट पाली, चोरवणे आदी गावांमधील प्रवाशांचा नियमित खोळंबा होत आहे. दिवसभरात १७ रेल्वे गाड्यांची ये जा होत असल्याने एकूण ३४ फेऱ्या दररोज होतात. या प्रत्येक फेरीसाठी किमान १० ते १५ मिनिटे फाटक बंद ठेवला जातो. याशिवाय हंगामात जादा गाड्या सोडल्या जातात, तेव्हा तर दिवसभरात अनेकदा फाटक बंद केला जातो. या कालावधीत स्थानिक प्रवाशांचे व वाहतुकदारांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात.
या फटकाच्या ठिकाणी उड्डाण पूल होण्यासाठी आतापर्यंत अनेकदा आंदोलन केली गेली. कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती अध्यक्ष शौकतभाई मुकादम व स्थानिक या उड्डाण पुलासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. उत्तर कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांनी आमदार शेखर निकम यांना पाठवलेल्या पत्रात उड्डाण पुलाच्या प्रक्रियेला गती मिळाली असल्याचा उल्लेख केला होता. या उड्डाण पूल निर्मितीसाठी सन २०२१-२२च्या अंदाजपत्रकानुसार सुमारे २० कोटी ५२ लाखाच्या निधीची आवश्यकता आहे. या उड्डाण पूल निर्मितीचे कार्य राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भूसंपादन प्रक्रियेसह आणि निधीच्या उपलब्धतेनुसार पूर्ण करण्याचे प्रयोजन केले आहे. मात्र उड्डाण पुलाच्या कामाला प्रत्यक्ष कधी सुरुवात होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.